Rohini Paradhye | रिलस्टार रोहिणीच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! थेट स्मशानभूमीतच नातेवाईक भिडले
Rohini Paradhye | सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातील ब्रह्मपुरी (Brahmapuri) येथे रिलस्टार रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच आता काही नवीन घडामोडी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांची चौकशी सुरू केली असून तपासाच्या विविध अंगांचा अभ्यास केला जात आहे.
रोहिणीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पारंपरिक सावडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी रोहिणी आणि तिचा पती निलेश (Nilesh) यांच्या दोन्ही कुटुंबांतील सदस्य तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला शोकाकुल वातावरणात सर्वजण एकमेकांना आधार देत होते. मात्र काही वेळाने अचानक काही नातेवाईकांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
उपस्थितांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद अधिक वाढल्याने स्मशानभूमीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे.
Rohini Paradhye | तपासात कॉल डिटेल्सवर भर :
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन्ही कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. पाराध्ये कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली असून इतर नातेवाईकांचेही जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून रोहिणी आणि निलेश यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) मागविण्यात आले असून त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मपुरीतील ‘हॉटेल ग्रामपंचायत’ (Hotel Grampanchayat) येथे रोहिणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्या वेळी निलेश हॉटेलच्या बाहेर बसलेला असल्याचे समोर आले आहे. रोहिणी आणि निलेश हे सोशल मीडियावर रिल्स तयार करून लोकप्रिय झाले होते आणि दोघांनी प्रेमविवाह केला होता. हॉटेल व्यवसाय चांगला सुरू असतानाही रोहिणीने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील सत्य तपासातून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
