Abhishek Banerjee | ममता बॅनर्जींच्या भाच्यावर संतप्त जमावाचा हल्ला! हेल्मेट घालून कसाबसा वाचवला जीव
Abhishek Banerjee | पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून आले आहे. तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) चे नेते आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यावर सोनारपूर (Sonarpur) येथे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अभिषेक बॅनर्जी हे एका मृत तृणमूल कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सोनारपूर येथे पोहोचले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दिशेने दगड आणि अंडी फेकल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला.
घटनास्थळी वाढत्या तणावामुळे सुरक्षा दलांनी अभिषेक बॅनर्जी यांना हेल्मेट घालून सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. विरोधासाठी जमलेल्या लोकांमध्ये महिलांचाही समावेश होता आणि काही महिलांच्या हातात कच्ची अंडी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Abhishek Banerjee | स्थानिकांचा संताप की राजकीय कट? :
घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी आपली बाजू मांडताना ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचा दावा केला. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि विकासकामांकडे दुर्लक्ष यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही मजुरी करणारे सामान्य नागरिक आहोत, आमच्या मूलभूत सुविधांच्या मागण्या अनेकदा मांडल्या; मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला.
सोनारपूर परिसरातील सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे अभिषेक बॅनर्जी यांनी या संपूर्ण घटनेमागे भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) असल्याचा आरोप केला आहे. भाजप समर्थित गुंडांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने दगडफेक केली, तसेच घटनेच्या वेळी पोलीस जाणीवपूर्वक अनुपस्थित होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
