जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडकलेले नागरिक:पाण्यामुळे त्रस्त, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नाही; ग्रामस्थांमध्ये नाराजी
![]()
शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे नगरसेवक वंदना विठ्ठलसिंह सोलंकी यांनी आज, शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अधिकारी विजय शेंडे यांच्याशी फोनवर संपर्क केला. तेव्हा त्यांनी अरेरावीची व उद्धट भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान मजीप्रा अधिकाऱ्याकडून असा अनुभव आल्यामुळे सोलंकी यांनी प्रभागातील रहिवाशांसह मजीप्रा कार्यालयावर धडक दिली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु काही जागरूक नागरिकांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. दर्यापुरातील राजपूतपुरा प्रभाग क्रमांक २ मधील पाणी समस्येबाबत यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांआधी अनेक महिला व पुरुष नागरिक नगरसेविका वंदना सोलंकी यांच्यासह जीवन प्राधिकरण कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले. तेव्हा कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ^प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या पाणी समस्येबाबत मी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी लोकप्रतिनिधींशी अत्यंत उद्धट व धमकीची भाषा वापरली. ‘तुमचे किती लोक आहेत ते घेऊन या. तुम्हाला जे करायचे आहे ते करा’ असे शब्द वापरण्यात आले. प्रशासनाकडून अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आहे. – वंदना सोलंकी, नगरसेवक, दर्यापुर लोकप्रतिनिधींशीअधिकाऱ्याने असे वागणे अत्यंत दुर्दैवी सैनिक पत्नीचे अश्रू अनावर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात चर्चा सुरू असताना सैनिक पत्नी बेबी वाकपांजर यांनी आमची घरे पाडू नका, अशी विनवणी करीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी उपस्थितांनाही गहिवरून आले होते.
