गहाळ झालेले 10 लाख रुपयांचे 60 मोबाईल मुळ मालकांना परत:हिंगोली जिल्ह्यातील पोलिस दलाची कामगिरी; शोध मोहिम यशस्वी

0
730-x-548-new-2026-05-30t104818825-4_1780130745.jpg




हिंगोली जिल्हयात गहाळ झालेल्या मोबाईलची शोध मोहिम हाती घेऊन जिल्हा पोलिसांनी तब्बल १० लाख रुपये किंमतीचे ६० मोबाईल शोधून मुळ मालकांना परत केले आहे. शनिवारी ता. ३० एका विशेष कार्यक्रमात पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लांबविले. या शिवाय बसस्थानक, रेल्वेस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन देखील चोरट्यांनी मोबाईलवर हातसाफ केले आहेत. जिल्हयात मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणून मोबाईल जप्तीसाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक मयुर रसाळ, गुन्हे शाखेेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन केले होते. यामध्ये जिल्हयातील १३ ठाणेदारांसह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार दत्ता नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, गणेश लेकुळे, प्रदीप झुंगरे, प्रणिता मोरे यांच्या पथकाने मागील एक महिन्यात ६० चोरीला गेलेले ६० मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान, आज विशेष कार्यक्रमात १० लाख रुपये किंमतीचे मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. पोलिस दलाच्या कामगिरी बद्दल नागरीकांनी कौतूक केले. पावती विना मोबाईल खरेदी करू नका जिल्हयात नागरीकांनी पावती विना मोबाईल खरेदी करू नये. तसेच जूना मोबाईल खरेदी करतांनाही ज्यांच्याकडून खरेदी करीत आहोत त्याच्याकडे पावतीची मागणी करावी. तसेच मोबईल हरविल्यानंतर तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed