राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट:पाकमध्ये बसलेल्या बॉसला खूश करण्यासाठी मोदींविरोधात बोलतात, मंत्री नीतेश राणे यांचा आरोप
![]()
भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकमध्ये बसलेल्या आपल्या बॉसला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतात, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या महागाई, इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी आदी विविध मुद्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी मोदींना चक्क महागाई मानवाची उपमा दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी त्यांच्यावर उपरोक्त टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले, राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकची भाषा आपल्या तोंडातून बोलतात. पाकला खुश करण्याची सर्व तयारी राहुल गांधी यांची आहे. ते तेथून येणारी स्क्रिप्ट येथे वाचून दाखवतात. पाकिस्तानातील आपल्या मालकाला खूश करण्यासाठी त्यांचा हस्तक राहुल गांधी येथे येतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतो. बकरीदला गोवंशाकडे पाहिले तर मुक्काम तुरुंगात नीतेश राणे यांनी यावेळी राज्यात अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची खुली विक्री केली जात असल्याचाही आरोप केला. ते या प्रकरणी एमआयएचे नेते वारीस पठाण यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची विक्री केली जात आहे. जनावरांची तस्करी सुरू आहे. तुम्हाला तुमच्याच धर्मातील जिहादींना आवर घालता येत नसेल, त्यांनी आमच्या हिंदू राष्ट्रात कसे वागावे हे शिकवता येत नसेल, तर आम्हाला जीआर काढून दंड ठोठावावा लागेल. त्यामुळे बकरीदच्या नावाखाली कुणी आमच्या गो मातेकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांचा मुक्काम थेट तुरुंगात असेल. नीतेश राणे यांनी यावेळी रस्त्यांवर अदा करण्यात नमाजासह कथितपणे शरिया कायदा लागू करण्यावर तुरुंगावासाचाही इशारा दिला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, गोमांसाशी संबंधित गुन्ह्यांत सहभाग असलेल्या व्यक्तींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यातील कठोर तरतुदी थेट लागू केल्या जातील. पोलिसांनी या प्रकरणी विविध ठिकाणी संचलन सुरू केले आहे. नियमांचे उल्लंघन करण्याचा किंवा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यासंबंधी तुरुंगाची हवा खावी लागेल. मदरसे बनले दहशतवादाचे अड्डे रस्त्यावर नमाद अदा करण्याच्या प्रथेचा संदर्भ देत ते म्हणाले, नमाज रस्त्यावर अदा करायची असेल, तर आपण मशिदीच बंद करून टाकूया. आपल्या हिंदू राष्ट्रातील रस्ते लोकांच्या चालण्यासाठी आहेत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी आहेत. पण सध्या रस्त्यांवर नमाज अदा केली जात आहे. मदरसेही सध्या दहशतवादाची केंद्र बनले आहेत, असे नीतेश राणे म्हणाले.
