कांदा कापल्यानंतरही अश्रू येणार नाही, त्यांच्याकडूनच अश्रू ढाळण्याचा प्रयत्न:कांदा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका; इंधन खरेदीमागेही साठेबाजीचा दावा
![]()
राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आणि इंधन तुटवड्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कांदा आंदोलनावरून विरोधकांवर टीका केली, तर दुसरीकडे इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेशही दिले. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची खरेदी अचानक वाढल्याने प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. विरोधकांच्या आंदोलनावर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही मंडळी फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, तेच आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आपल्या सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव असून, राज्य आणि केंद्र सरकार संवेदनशीलतेने काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. 15 रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय यापूर्वी कोणी घेतला होता का, हे विरोधकांनी दाखवावं, असे आव्हानही त्यांनी दिले. कांद्याच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने नुकताच कांदा खरेदी दरात वाढ केल्याची माहिती दिली. केंद्राने खरेदी दरात सुमारे 3.5 रुपयांची वाढ करत तो जवळपास 15 रुपयांपर्यंत नेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने केंद्राकडे विशेष बैठकीची मागणी केली होती आणि त्यानुसार उद्या सायंकाळी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, राज्यात इंधन खरेदीत अचानक वाढ झाल्याने सरकार चिंतेत आहे. पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा 23 टक्के वाढ झाली असून, डिझेलची मागणी 52 टक्क्यांनी वाढल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. काही भागात तर इंधन पुरवठा 70 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढ नैसर्गिक नसून काही ठिकाणी साठेबाजी सुरू असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे पुरवठा विभाग आणि गृह विभागाला संयुक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा आणि भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त इंधन खरेदी करत आहेत. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोण साठेबाजी करत आहे, कोण अतिरिक्त इंधन खरेदी करत आहे, याचा तातडीने शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सरकार ॲक्शन मोडमध्ये राज्यातील कांदा आंदोलन, वाढती इंधन खरेदी आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रासोबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे इंधन साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाला सज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय हालचाली आणखी वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
