इंधन दरवाढीविरोधात नागपुरात सायकल मोर्चा:माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
![]()
देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने मोठी वाढ होत असून या अनियंत्रित भाववाढीमुळे आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्ग कमालीचा होरपळून निघाला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. या तीव्र इंधनटंचाई आणि दरवाढीचा निषेध करण्यासाठी अनिल देशमुख यांनी आज नागपुरात स्वतः सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष निवेदन सादर केले. सध्या शेतीचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच बाजारात डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत असून, डिझेल वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे ट्रॅक्टर व इतर शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत आणि यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा आणखीनच हवालदिल झाला आहे, अशी चिंता त्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे. डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे मालवाहतूक प्रचंड महागली असून याचा थेट फटका दळणवळणावर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बसत आहे; वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून या वाढत्या महागाईमुळे राज्यातील सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे कौटुंबिक अर्थकारण पूर्णपणे बिघडून गेले आहे, याकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, तसेच शेतकऱ्यां-साठी आणि वाहतूकदारांसाठी डिझेलचा पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, जेणेकरून राज्यातील जनतेला या आर्थिक संकटातून तात्काळ दिलासा मिळेल, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
