Diesel Crisis | पेट्रोल-डिझेल टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांनी घेतली आक्रमक भूमिका!
Diesel Crisis | राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईसंदर्भातील चर्चांना वेग आला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. इंधनाची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासन सतर्क झाले असून पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त मोहीम राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात पेट्रोलच्या वापरापेक्षा सुमारे 23 टक्के अधिक पुरवठा करण्यात येत आहे. तरीदेखील अनेक भागांत टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल 52 टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी याच कालावधीत जितका पुरवठा होत होता, त्याच्या तुलनेत यंदा खप मोठ्या प्रमाणावर वाढला असून सरकारकडून सतत पुरवठा सुरू ठेवण्यात येत आहे.
(Akola) जिल्ह्यात डिझेलच्या मागणीत 154 टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच इतर काही जिल्ह्यांमध्येही 70 टक्क्यांहून अधिक खपत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांना इंधनाचा पुरेसा पुरवठा मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत असले तरी काहीजण गैरफायदा घेत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. व्यावसायिक वापरासाठी सामान्य कोट्यातील इंधन वळवले जात आहे का, याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
Diesel Crisis | प्रणिती शिंदेंवरही टीका :
यापूर्वी शनिवारीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्यावर भाष्य केले होते. शेतकऱ्यांच्या गरजेसाठी आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले तरी शेतकऱ्यांच्या नावाखाली साठेबाजी होत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. काही भागांत अचानक 20 ते 30 टक्के मागणी वाढल्याने यामागे काहीतरी संशयास्पद घडत असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. त्या प्रथमच खासदार झाल्या असून अधिक परिपक्वपणे वक्तव्य करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. कोणाबद्दल बोलत आहोत याची जाणीव नसल्यास जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला.
