इंधनाची साठेबाजी करू देऊ नका:मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर प्लॅन तयार असल्याची ग्वाही

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-22t13_1779435291.png




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या काही ठिकाणी इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. सरकारने या प्रकरणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल – डिझेल विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा प्लॅन तयार असल्याचेही स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित इमॅजिन नेक्स्ट-2026 या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपण एआय तंत्रज्ञानाला टाळू शकत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, इमॅजिन नेक्स्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट येथे होत आहे. एआय व टेक्नॉलॉजीशी संबंधित लोकांना येथे निमंत्रित करण्यात आले होते. मी या कार्यक्रमाला एआयच्या अॅडोप्शन संदर्भात महाराष्ट्र काय करत आहे, याची माहिती दिली. कारण, आपल्याला माहिती आहे की, एआयची लाट आता कुणीही थांबवू शकत नाही. पण आपण त्या लाटेवर स्वार होऊन आपल्या सामाजिक व आर्थिक लढाईला गती देऊ शकतो. तोच प्रयत्न इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तोच प्रयत्न महाराष्ट्रात आपण करत आहोत. या प्रकरणी आपली रणनीती काय आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. सध्याचा आपला विकास दर पुढील 2-3 वर्षे कायम ठेवला, तर आपण सिंगापूर व यूएईला मागे टाकू शकतो अशी स्थिती आहे. पंतप्रधानांचे जे मिशन आहे तेच आमचे मिशन आहे. तेच मिशन आम्ही महाराष्ट्रातही राबवत आहोत. कारण, सध्या देश जगाच्या अशा वळणावर उभा आहे की, आत्ता नाही तर कधीच नाही. आम्ही अशा विकासाच्या मार्गावर चालत आहोत. त्यामुळे 2045 विकसित महाराष्ट्र व विकसित भारत बनेल. इंधन टंचाईवर काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांनी यावेळी पेट्रोल – डिझेलच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने या प्रकरणी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पेट्रोल – डिझेल विशेषतः डिझेल सध्या शेतीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे आपण जिल्हाधिकाऱ्यांना यात जातीने लक्ष घालून यासंबंधी नीट प्लॅनिंग करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी कुणालाही साठेबाजी करू देऊ नका असे सांगितले आहे. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळाले पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी निश्चितच तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडते आणि तिचा गाजावाजा होतो. पण तो ही होऊ नये याचा प्रयत्न सरकार करेल. अल निनोच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा प्लॅन तयार केला आहे. अल निनोमुळे वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस होईल. काही ठिकाणी पावसाचा तुटवडा जास्तही असू शकतो. या प्रकरणी जी काही खबरदारी घ्यायची आहे, ती घेईल, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. राज्यसभेच्या रिक्त जागेवरही केले भाष्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरही भाष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य तो निर्णय घेईल. त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल. कारण, त्या जागेवर कुणी निवडणूक लढेल असे मला वाटत नाही. आमच्याकडे सत्ता पक्ष म्हणून 232 मते आहेत. त्यामुळे एकदा उमेदवार ठरला की, पुढची कारवाई करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed