महायुतीचा फॉर्म्युला फिक्स! रणसंग्रामाआधी मास्टरप्लॅन तयार:विधानपरिषदेत भाजपचा दबदबा, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

0
3-photo-10_1779440308.png




राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक म्हणजे 12 जागांवर उमेदवार देणार असून शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याचं बोललं जात आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता महायुतीची स्थिती मजबूत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू असून याच आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील जागावाटप करताना प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या आणि पक्षाची ताकद विचारात घेतली जात आहे. ज्या भागात ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक आहे, त्या पक्षाकडे संबंधित जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 12 जागा आल्या आहेत. काही ठिकाणी पारंपरिक जागांमध्ये बदल करण्याबाबतही चर्चा झाली असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्राथमिक चर्चेनुसार भाजप नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर या 12 जागांवर दावा करणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या 3 जागा जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी या 2 जागांवर निवडणूक लढवू शकते, अशी माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. 25 मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून 1 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे आता महायुतीसोबतच विरोधकांच्याही हालचालींना वेग आला असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *