काँग्रेसचे मुंबई महासचिव तुषार गायकवाड यांचे निधन:अविस्मरणीय आठवणींच्या रूपाने तू सदैव जिवंत राहशील, बहीण खा. वर्षा गायकवाड झाल्या भावुक

0
730-x-548-new-2026-05-19t092733487_1779163401.jpg




मुंबईतील एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू आणि मुंबई काँग्रेसचे महासचिव तुषार एकनाथ गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुषार गायकवाड हे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत एकनाथ गायकवाड यांचे पुत्र होते. गायकवाड कुटुंब हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या राजकारणात प्रभावी आणि मोठे नाव मानले जाते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे. तुषार गायकवाड हे मुंबई काँग्रेसमध्ये महासचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पक्ष संघटनामध्ये ते सक्रियपणे काम करत होते. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. 2021 मध्ये कोरोनामुळे त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर गायकवाड कुटुंबावर आलेला हा आणखी एक मोठा आघात मानला जात आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्याही मोठा धक्का मानला जात आहे. तुषार गायकवाड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी 1 ते 2 या वेळेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी कोर्टाजवळ येथे नागरिक आणि कार्यकर्त्यांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अविस्मरणीय आठवणींच्या रूपाने तू सदैव जिवंत राहशील – वर्षा गायकवाड यांची पोस्ट आज आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली…माझा लाडका दादा तुषार आम्हाला कायमचा सोडून गेला लहानपणापासून प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तू.. माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी होणारा तू.. आणि माझ्या प्रत्येक दुःखात आधार देणारा तू.. आज अचानक निघून गेलास… तू फक्त माझा भाऊ नव्हतास, तर माझा मित्र, मार्गदर्शक आणि पक्का सोबती होतास. अण्णा गेल्यानंतर तूच आमची सावली होतास. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करणं माझ्यासाठी अवघड आहे. आपण एकत्र घालवलेले आनंदाचे गोड क्षण, हसणं, गप्पा-गोष्टी, अविस्मरणीय आठवणींच्या रूपाने तू सदैव जिवंत राहशील. दादा,गेले काही दिवस तुला फार त्रास सहन करावा लागला; पण आता तुझा पुढील प्रवास शांतमय होवो… जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा. Will miss you, Tushardada!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed