TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही:'थ्री-स्टेज' रॅकेट; मतीन पटेलला वाचवण्यासाठीच ओवैसींची धडपड – संजय शिरसाट
![]()
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी आणि एमआयएम (MIM) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार असे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला वाचवण्यासाठी ओवैसींची धडपड असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून ते या प्रकरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, “टीसीएसमधील प्रकरण निदा खानपुरते मर्यादित नाही. इम्तियाज जलील यांनी एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला निदा खानला घर देण्यास सांगितले. मतीन पटेल याला वाचवण्यासाठी असदुद्दीन ओवैसी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहे. ते प्रेस घेऊन बोलणार आहे. एकाला वाचवण्यासाठी दुसरा कसा धडपड करतोय हे पाहायला मिळेल.” या प्रकरणाला राजकीय स्वरूप देऊ नये संजय शिरसाट म्हणाले, “निदा खान प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सांगितलंय की, एमआयएमचा नगरसेवक आरोपी आहेच आहे. पण त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांनाही अटक केली जाईल. मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाला राजकीय स्वरूप देऊ नये. हा प्रकार अत्यंत गंभीरपणे घेण्याचा प्रकार आहे.” धर्मांतर आणि ड्रग्जचे ‘थ्री-स्टेज’ रॅकेट? संजय शिरसाट यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना अत्यंत धक्कादायक दावे केले. त्यांच्या मते, ही यंत्रणा तीन पातळ्यांवर काम करते. “धर्मांतरण करणे, लव्ह जिहाद करणे आणि ड्रग्सचा व्यापार करून इतर समाजातील लोकांना बिघडवणे किंवा त्यांना नशेखोर करण्याचे काम, या तिन्ही स्टेजवर ही यंत्रणा काम करते. एमआयएमचे सो कॉल्ड नेते कुणाचे तरी मोहरे आहेत. म्हणून याचा तपास फार लांबपर्यंत जाणार आहे. त्यातून मोठे रॅकेट बाहेर येणार आहे. माझे इम्तियाज जलीलशी वैर आहे, म्हणून हा प्रकार चाललाय असे समजण्याचे कोणतेही कारण नाही,” असे संजय शिरसाट म्हणाले. मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. “नगरसेवक मतीन पटेल हा आरोपी आहेच, पण त्याला मदत करणाऱ्या इतरांनाही पोलीस बेड्या ठोकतील. नाशिक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, सरकार आणि मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमआयएम का बोलतेय? शिरसाट यांचा सवाल निदा खानच्या अटकेनंतर तिचा पती अद्याप बेपत्ता आहे, तसेच तिच्या कुटुंबाकडून कोणीही बाजू मांडायला पुढे येत नाहीये. अशा परिस्थितीत एमआयएमचे नेते इतके आक्रमक का होत आहेत? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. “जेव्हा पोलीस या आरोपींची कस्टडी घेऊन चौकशी करतील, तेव्हा हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर नाचत होते, हे समोर येईल.महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. आताच त्यांना पायबंद घातला, तर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे,” असेही ते म्हणाले.
