कुठे पाऊस, कुठे उकाडा!:विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचे सावट, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात 'यलो अलर्ट, यवतमाळ- गडचिरोलीत मुसळधार पावसाचे संकेत
![]()
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळत असून, राज्याचा एक भाग पावसाने ओलाचिंब होत असताना दुसरा भाग मात्र उष्णतेने होरपळून निघत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांसह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचे सावट आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल. मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने अनेक ठिकाणी गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही. आज ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारपर्यंत वादळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसानंतरही तापमान जैसे थे; अकोला @ 42.1 अंश अकोल्यात काही ठिकाणीअवकाळी पाऊस पडल्यानंतरही किमान तापमान कमी झाले नसल्याचे जाणवले. काल संध्याकाळी जिल्ह्यात 42.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.तसेच 11 मेपर्यंत वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाजही मंगळवारी हवामान विभागाने वर्तवला. शनिवारीही मराठवाडा, विदर्भात पावसाचा अलर्ट मराठवाड्यातील संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी पाऊस बरसला. लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राज्यातील बहुतांश भागातही ढगाळ वातावरण राहिल्याने उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळाला. संभाजीनगर जिल्ह्यात हलका व मध्यम पाऊस झाला, तर लातूर जिल्ह्यात उदगीर, देवणी, जळकोट या तालुक्यांमध्ये वादळी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यत अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. परभणी शहरासह जिल्ह्यात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.
