एमआयटी डब्ल्यूपीयूत 'विश्वनोव्हा 2026' चे आयोजन:कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर; देशभरातून 700 हून अधिक संघांचा सहभाग
![]()
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे ‘विश्वनोव्हा २०२६’ या बौद्धिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून ७०० हून अधिक संघांमधील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अंतर्भाव करणे आधुनिक युगात अपरिहार्य असल्याचे मत अॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले. ‘विश्वनोव्हा २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भूपेश गहोत्रा बोलत होते. यावेळी सीगेट टेक्नोलॉजीचे कृष्णकुमार माधवन, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरू व विश्वनोव्हाचे मुख्य संयोजक डॉ. मिलिंद पांडे, इनोव्हेशनचे डीन डॉ. गणेश काकंडीकर आणि आयआयसीच्या संयोजक प्रा. डॉ. दिपाली जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त, दहा संघांना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भूपेश गहोत्रा यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंतर्भाव केवळ तांत्रिक प्रगती नसून, व्यवसायांची चपळता आणि जीवनाचा दर्जा उंचावण्याची प्रक्रिया आहे. डेटा सुरक्षा आणि नैतिकतेचा विचार करून याचा वापर केल्यास अधिक शाश्वत आणि प्रगत भविष्य घडवता येते. मानवी क्षमतांना डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन कामे अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम बनवता येतात, असेही ते म्हणाले. कृष्णकुमार माधवन यांनी नमूद केले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ब्लॉकचेन आणि जैवतंत्रज्ञान यांसारखी उदयनोन्मुख तंत्रज्ञान भविष्यातील मानवी जीवनात क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य ठेवतात. तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने आणि नैतिकतेने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना भारताचे खरे भविष्य संबोधले. राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रकल्प-आधारित शिक्षण आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांच्या माध्यमातून युवा पिढीला सतत प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गणेश काकंडीकर म्हणाले की, या उपक्रमामुळे व्यावसायिकांमध्ये संशोधन, स्टार्टअप्स आणि तांत्रिक प्रगतीची संस्कृती अधिक बळकट होईल. युवकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे समाजासाठी उपयुक्त अशा प्रभावी उपायांमध्ये रूपांतर करण्यास प्रेरित केले जात आहे. डॉ. दिपाली जावळे यांनी सांगितले की, हा उपक्रम विद्यार्थ्यांची प्रतिभा, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तांत्रिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या कल्पनांना विकसित करून भविष्यातील नवोन्मेषकांना घडवण्यात आणि अंमलबजावणी-आधारित नवोन्मेषणाच्या संस्कृतीला चालना देण्यात हे महत्त्वपूर्ण आहे.
