copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-05t193947677_1777990226.jpg



राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत असून, काही भागांत सूर्याचा प्रकोप जाणवत असतानाच इतरत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकां

.

हवामान विभागाने विदर्भातील, प्रामुख्याने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस तापमान सामान्य पातळीवर राहणार असल्याने विदर्भवासीयांना कडाक्याच्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून 8 मे पासून तापमानात पुन्हा झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 8 तारखेपासून विदर्भाचा पारा 45°C पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा भीषण उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण लहरींमुळे संपूर्ण मे महिना विदर्भासाठी प्रचंड चटके देणारा ठरणार आहे. या काळात तापमानात लक्षणीय वाढ होणार असून, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विदर्भातील जनतेला असह्य उन्हाचा सामना करावा लागेल. वाढत्या पाऱ्याचा धोका लक्षात घेता, हवामान विभागाने नागरिकांना पुढील दोन दिवस विशेष खबरदारी घेण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत अवकाळी

तर दुसरीकडे हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाज खरा ठरला असून, विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. गोंदियात दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकांसह आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यात तर तीन दिवसांतील ही दुसरी वेळ असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली असून, पावसामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेत. यामुळे कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेला धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

हिंगोली शहरासह परिसरातही वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

हिंगोली शहरासह परिसरातही अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. भर उन्हाळ्यात आलेल्या या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला, तरी बाजारपेठेतील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांची मोठी धांदल उडाली. उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेला माल सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी विक्रेत्यांची मोठी पळापळ झाली. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही वाढत्या उन्हाच्या चटक्यांपासून काही काळ दिलासा मिळाला, मात्र व्यावसायिक दृष्टीने हा पाऊस अडचणीचा ठरला.

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. विशेषतः धडगाव तालुक्यातील काकार्डे परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शेतातून काढून ठेवलेले पीक भिजल्याने ते खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, या पावसाचा एक सकारात्मक पैलू म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी नव्याने फळबागांची लागवड केली आहे, त्यांच्यासाठी हा पाऊस काहीसा फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा प्रकारे राज्याच्या विविध भागात अवकाळीने कुठे नुकसान तर कुठे अंशतः दिलासा अशी संमिश्र परिस्थिती निर्माण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed