भोंदूबाबाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पालघर जिल्ह्यातील संतापजनक घटना; भोंदू नराधमांना कायद्याचा धाक नाही – रोहित पवार

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-05t15_1777973847.png




पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्यात भोंदू नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादीच्या बहिणीची मासिक पाळी थांबत नव्हती. त्यामुळे गावठी औषध आणण्यासाठी त्याने भोंदू शिवराम परश सावर याच्या संपर्क साधला होता. त्यानुसार, आरोपी 3 मे रोजी स्वतः खुताडपाडा येथे पोहोचला. त्यानंतर त्याने फिर्यादीसह पीडित मुलगी, तिचे नातेवाईक व साक्षीदार यांना आपल्या इको कारमध्ये बसवून डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात नेले. तिथे रात्री 11.30 च्या सुमारास आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना वाहनात थांबण्यास सांगितले. त्यानंतर औषध तयार करण्यासाठी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन तो रस्त्यालगतच्या जंगलात गेला. तिथे मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी जबरदस्तीचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला पुन्हा तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पीडित मुलीने घरी परतल्यानंतर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ कासा पोलिस ठाण्यात धाव घेऊन भोंदू शिवराम सावर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा विषय हाताळा – रोहित पवार दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा दाखला देत राज्यातील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, राज्यात भोंदूबाबांकडून महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेईनात. आता पालघरमध्येही एका भोंदूने अघोरी पूजेसाठी बोलावून एका 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुढं आली. भडगाव (जळगाव) इथं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बिबवेवाडीत 9 वर्षीय मुलीची छेडछाड, चाकणमध्ये 11 वर्षीय मुलावर अत्याचार तर गोंदियामध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग, केजमध्ये आजोबाकडूनच 3 वर्षीय नातीवर अत्याचार अशा विकृत आणि किळसवाण्या घटनांची मालिका रोज सुरूये. या भोंदू नराधमांना कायद्याचा कुठलाही धाक राहिला नाही. गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्षे सुनावणी, मात्र पुढं काहीच होत नाही. किती दिवस हे असंच चालू ठेवणार? गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कायदा कुचकामी ठरत असेल तर तो बदललाच पाहिजे. सरकारने इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा हा विषय गांभीर्याने घेऊन तत्काळ आठवडाभरात विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अमलात आणावा, ही विनंती, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed