मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित:विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, संयम राखा, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचे व गुलाल न उधळण्याचे आवाहन केले आहे. बारामतीकरांनी या मतदानाद्वारे दादांनी केलेल्या विकासकामांचे प्रतीक म्हणून त्यांना भावांजली वाहिली, असेही त्या यावेळी म्हणाल्या. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी विक्रमी विजयी आघाडी घेतली आहे. त्यांना आव्हान दिलेल्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उपरोक्त आवाहन केले आहे. बारामतीत मतमोजणी सुरू असताना म्हणाल्या, आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीकरांनी दादांवरील विश्वास व्यक्त केला सुनेत्रा पवारांचा बारामतीत विक्रमी विजय झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बारामतीकरांनी आपल्या मतांद्वारे अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, खरेतर अजितदादांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. अशा निवडणुकीला मला सामोरे जावे लागेल असे मला कधीही वाटले नव्हते. मन खरे तर खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी दादांवर विश्वास दाखवला आहे. प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकासकामांचे प्रतीक म्हणून त्यांना भावांजली वाहिली आहे. मतदारांनी अजित पवारांवरील विश्वास, त्यांनी केलेली विकासकामे व जनतेवरील प्रेम, हे आपल्या मतांतून दाखवून दिले आहे. सोशल मीडियावर विकासाचा वादा वहिनी आणि दादा असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू झाला आहे. पत्रकारांनी सुनेत्रा पवारांचे याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचे मतदान केले, त्यावरून दादांवरील अढळ विश्वास, त्यांनी माझ्या पाठीशीही उभा केल्याचे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे आभार मानते. त्यांनी दिलेला व दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. या मतदानामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. अजितदादांनी आजपर्यंत बारामतीकरांना जी विकासाची स्वप्ने दाखवली, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन. बारामती हे माझे कुटुंब बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक नकोच होती. पण तरीही ही निवडणूक झाली. त्यात मतदारांनी अजितदादांविषयीची आपली भावना या निवडणुकीद्वारे व्यक्त केली. त्यामुळेच ही निवडणूक जल्लोषाची नाही. ही अजिदादांना आदरांजली वाहण्याची वेळ आहे. बारामतीकरांचेही हेच मत आहे. पण काही लोकांना उत्साह असतो. बारामती हे माझे कुटुंब आहे. शरद पवारांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी ज्या प्रकारचे काम, ज्या प्रकारचा विश्वास व ज्या प्रकारची सेवा केली, त्याचा विश्वास आज त्यांनी आपल्या मतांतून दिला आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजित पवारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तसेच सहानुभूतीच्या लाटेमुळे कुठल्याही प्रमुख पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे येथून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या कलांमध्येच सुनेत्रा पवार यांना सध्या 65 हजारांहून अधिक मतांनी मोठी आघाडी घेतली आहे. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले आघाडीवर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील जागा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. याठिकाणी भाजपाने शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीतच अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
