सावरकरांनी 5 वेळा इंग्रजांना दया याचिका पाठवल्या:सात्यकी सावरकरांची न्यायालयात साक्ष, द्विराष्ट्रवादावरही मांडली भूमिका
![]()
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सात्यकी सावरकर यांनी सावरकरांच्या दया याचिका, गोवंश विचार आणि सैन्य भरती यांसारख्या विविध ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर न्यायालयात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. न्यायालयात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सात्यकी सावरकर म्हणाले की, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना सावरकरांनी पाच वेळा ब्रिटीश सरकारला दया याचिका पाठवल्या होत्या, हे सत्य आहे. मात्र, त्या काळी सावरकरांप्रमाणेच इतर अनेक राजकीय कैद्यांनीही अशा कायदेशीर याचिकांचा आधार घेतला होता. द्विराष्ट्रवादाच्या मुद्द्यावर बोलताना तसेच सावरकरांचा बचाव करताना सात्यकी सावरकर म्हणाले, ही संकल्पना सावरकरांनी मांडलेली नाही. काही इतिहासकार तसा आरोप करत असले तरी, मूळ संकल्पना सर सय्यद अहमद खान यांची होती. सावरकरांनी केवळ तत्कालीन परिस्थितीतील वस्तुस्थितीवर भाष्य केले होते. सावरकरांनी कधीही गाईला देव मानले नाही सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा संदर्भ देताना सात्यकी म्हणाले, सावरकरांनी कधीही गाईला देव मानले नाही. त्यांच्या मते गाय हा एक उपयुक्त पशू होता. हा संदर्भ सावरकरांच्याच साहित्यातून येतो. तसेच कोणतीही मागणी केली नसल्याचा देखील खुलासा त्यांनी यावेळी न्यायालयात बोलताना केला. सैन्यात भरती व्हावे ही सावरकरांची रणनीती दुसऱ्या महायुद्धात सावरकरांनी भारतीय नागरिकांना ब्रिटिश सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले होते, याविषयी बोलताना सात्यकी म्हणाले, सावरकरांवर हा आरोप नसून आक्षेप आहे. तरुणांनी सैन्यात भरती व्हावे ही सावरकरांची रणनीती होती. भारतीयांना लष्करी प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रांचा अनुभव मिळावा, जेणेकरून स्वतंत्र भारताकडे स्वतःचे सक्षम सैन्य असेल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या याच भूमिकेमुळे 1947 मध्ये पाकिस्तानच्या आक्रमणावेळी भारताकडे प्रशिक्षित सैन्य सज्ज होते. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले? भगतसिंग व इतर क्रांतिकारकांशी सावरकरांच्या तुलनेवर भाष्य करणे सात्यकी सावरकर यांनी टाळले असून, महापुरुषांचे उदात्तीकरण किंवा संसदेतील तैलचित्रांबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याच्या विषयावर बोलताना त्यांनी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना (नेहरू-गांधी) हा सन्मान मिळाल्याचा संदर्भ दिला. मात्र सावरकरांच्या बाबतीत असा निर्णय घेणे हे पूर्णपणे सरकारच्या अखत्यारीत असून आपण स्वतःहून तशी कोणतीही मागणी केली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
