टरबूज खाल्ल्यामुळे दोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नाही:FDA चा कलिंगडात भेसळ आढळली नसल्याचा दावा; मग 4 जणांचा मृत्यू कशाने झाला?

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-02t11_1777700078.png




मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृ्त्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने आपल्या अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबुजात कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा दावा केला आहे. परिणामी, टरबूज खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उजेडात आली होती. या मृत्यूंमुळे राज्यासह देशात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अर्धवट उरलेल्या कलिंगडाचे नमुने घेतले होते. हे नमुने त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे. काय आहे एफडीएच्या अहवालात? एफडीएच्या अहवालानुसार, दोकाडिया कुटुंबीयांच्या घरात आढळलेल्या कलिंगडात कोणत्याही प्रकारची भेसळ आढळली नाही. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. यात बिर्याणी, कलिंगड, माठ व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर व मसाले यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी कलिंगडाची तपासणी केली. पण त्याचा रंग, गोडवा व आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नाही. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यामुळे दोकाडिया कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मृत कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर अन्नपदार्थांतही अद्याप कोणतीही भेसळ आढळली नाही. त्यामुळे आता सर्व लक्ष मृतांचा अंतिम न्यायवैद्यक अहवाल व बॅक्टेरियल चाचण्यांकडे लागले आहे. पण तूर्त दोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याविषयीचे गूढ अधिकच वाढले आहे. मृतांचे अंतर्गत अवयव पडले होते हिरवट दुसरीकडे, प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मृत्यूंविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर करण्यात आलेल्या न्यायवैद्यक तपासणीत मृतांचा मेंदू, हृदय व आतडी यांचा रंग हिरवट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्यतः साध्या अन्न विषबाधेत अशा प्रकारे अंतर्गत अवयवांचा रंग बदलत नाही. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अत्यंत विषारी रासायनिक घटकांचा शरीरात शिरकाव झाल्यामुळे घडला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. अब्दुल्ला दोकाडियांच्या शरीरात आढळले मॉर्फिन प्रस्तुत प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृत अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन आढळून आले आहे. मॉर्फिन हे एक अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे. ते सामान्यतः शस्त्रक्रिया किंवा तीव्र कर्करोगाच्या वेदना कमी करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली वापरले जाते. त्यामुळे अब्दुल्ला यांच्या शरीरात हे औषध कसे काय आले? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. प्रारंभी हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेचा असावा असा अंदाज होता. पण न्यायवैद्यक चाचणीतील नवीन निरीक्षणे पाहता हा प्रकार अन्न विषबाधेपेक्षा पूर्णतः वेगळा असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट पदार्थाचा डोस दिल्यामुळे किंवा रसायनाचा मानवी शरीरावर असा परिणाम होतो का? या दिशेने आता तपास यंत्रणा तपास करत आहेत. प्राथमिक चाचणीत ही माहिती पुढे आली असली, तरी पोलिस व वैद्यकीय तज्ज्ञांना या प्रकरणी अद्याप अंतिम न्यायवैद्यक अहवालाची प्रतिक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतरच या चौघांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed