बारामतीत सुनेत्रा पवारांचा रेकॉर्ड होणार!:युगेंद्र पवारांनी सांगितला विजयाचा आकडा; म्हणाले- पवार विरुद्ध पवार लढत नकोच
![]()
राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी मतदारसंघात मतदान पार पडले असून, आता 4 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयापेक्षा त्यांच्या मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी बारामतीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या संभाव्य मताधिक्याचा आकडा वर्तवला आहे. युगेंद्र पवार म्हणाले, पुरंदर उपसा सिंचन आणि जाणाई शिरसाईचे पाणी बारामतीतील जिरायती पट्ट्याला मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपल्या प्रयत्नांना यश आलेले आहे. त्यानंतर ते म्हणाले, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार नव्हता. येथील मतदारसंघात 2 लाख 24 हजार मतदान झाले आहे, त्यापैकी 2 लाख 20 हजार मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना पवार विरुद्ध पवार अशा संभाव्य लढाईबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको. या आधी मी देखील बोललो आहे, जय देखील बोलला आहे. काल सुप्रियाताईंचे वक्तव्य मी ऐकले. सुनेत्रा काकी देखील बोलल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून एक असले पाहिजे, पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नाही पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाता संदर्भात आमचे म्हणणे एवढेच आहे की, सत्य समोर आले पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, जो डीजेसीएचा अहवाल आला होता त्यामध्ये अनेक त्रुटी आम्हाला आढळल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या बाजूने तपास होत असला तरी यातून सत्य बाहेर आले पाहिजे. अजितदादांच्या काळात पाण्याचे प्रश्न भेडसावत नव्हते सध्याच्या टंचाईग्रस्त दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन युगेंद्र पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतः सिंचन भवनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली, ज्यानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आणि आता प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. अजितदादांच्या काळात पाण्याचे प्रश्न भेडसावत नव्हते, मात्र आता निर्माण झालेल्या नवीन समस्यांवर मात करण्यासाठी आपण पवार साहेबांचा आदर्श समोर ठेवून काम करत आहोत, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. लोकांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून, कऱ्हा आणि नीरा नदी स्थिरीकरणासारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कऱ्हा-नीरा स्थिरीकरण हे अजितदादांचे स्वप्न असून या प्रकल्पांमुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. कोणत्याही निवडणुकीची पर्वा न करता, शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि पवार साहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपत दुष्काळी भागात जनसेवेचे हे काम यापुढेही सातत्याने सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
