पालघरमधील त्या दोन मृत्यूंचा उलगडा:अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून जखमी मित्रानेही संपवली जीवनयात्रा, परिसरात खळबळ
![]()
पालघरमधील नानिवली येथे आज पहाटे दोन मित्रांचे मृतदेह आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून सीसीटीव्ही फुटेजमधून या भीषण अपघाताचे वास्तव समोर आले आहे. भरधाव वेगातील दुचाकी आधी इलेक्ट्रिक सोलर पोलला आणि नंतर थेट झाडावर आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघाताच्या या भीषण धक्क्यातून सावरू न शकलेल्या दुसऱ्या जखमी मित्राने शेजारीच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसमारंभ उरकून घरी परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 15 वर्षीय वैभव लहांगे याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या जिवलग मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून हादरलेल्या जखमी नितीन वरठा यानेही त्या धक्क्यातून शेजारीच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कारंजा येथील दोनद जवळ मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने समोर लोखंडी रोल आणि पत्रा वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग भडकली. दुर्दैवाने, या आगीत ट्रक चालकाला बाहेर पडता आले नाही आणि आगीत होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली असून, अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला यश येण्यापूर्वीच ट्रक आणि चालकाचा पूर्णतः कोळसा झाला होता.
