मे महिन्याची सुरुवातच आव्हानात्मक:सूर्याने आग ओकल्यानंतर आता अवकाळी पावसाचे सावट, पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे
![]()
मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी हवामानातील टोकाच्या बदलांची ठरली असून, एकीकडे पुणे आणि मुंबईसह अनेक शहरांत तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेल्याने नागरिक भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे जनजीवन होरपळून निघाले असतानाच, हवामान विभागाने आता अवकाळी पावसाचा इशारा देऊन राज्याच्या हवामानात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. कडाक्याची उष्णता आणि संभाव्य अवकाळी पाऊस या विचित्र समीकरणामुळे पुढील 48 तास संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, या भागात पारा 46 अंशांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागपूरमध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, मुंबईतही दमट हवामानामुळे नागरिक हैराण आहेत. पुढील 4 दिवस मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. या वाढत्या उष्म्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना दुपारच्या वेळी कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत अवकाळी पावसाचा इशारा भीषण उन्हाच्या कडाक्यात होरपळणाऱ्या विदर्भासाठी एक दिलासादायक बातमी असून उद्या, 2 मे पासून वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी पावसापूर्वीची उष्णता मात्र अधिक असह्य ठरणार आहे. विशेष म्हणजे, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्याच्या हवामानातील हा ‘ऊन-पावसाचा खेळ’ असाच सुरू राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवस घराबाहेर न पाडण्याचे आवाहन वाढत्या तापमानाचा धोका लक्षात घेता पुढील दोन दिवस घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, आरोग्य विभागाने सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, दुपारी 12 ते 4 या अतिउष्णतेच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे आरोग्यासाठी अनिवार्य मानले जात आहे. केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात वाढलेल्या पाऱ्याचा आता शेतीवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने बळीराजा चिंतेत आहे.
