‘घाटी’त 3 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा!:उन्हाळ्यामुळे शिबिरे झाली ठप्प, खासगी पेढ्यांतही रक्ताच्या पुरवठ्याची अडचण
![]()
उन्हाळ्यामध्ये शिबिरांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या घाटीत केवळ १५० बॅग रक्त शिल्लक असून हा साठा अवघे ३ ते ४ दिवस पुरेल इतकाच आहे. हीच परिस्थिती जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांतही आहे. रक्तटंचाईचा परिणाम शस्त्रक्रियांवर होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटते. मात्र, यंदा तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने सामाजिक संस्थांकडून आयोजित केली जाणारी शिबिरे जवळपास ठप्प झाली आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे रक्तदातेही केंद्रावर येण्यास टाळाटाळ करत आहेत. घाटीत दररोज किमान ३० ते ३५ बॅग रक्त लागते. सध्या केवळ १५० बॅग आहेत. घाटी रुग्णालयात दररोज होणाऱ्या शस्त्रक्रिया, अपघातातील रुग्ण, गंभीर आजारी रुग्ण आणि थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्ताची मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे रक्तदांत्यांनी रक्तदान करण्याची आणि सामाजिक संस्थांनी शिबिरे घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात दररोज १० बॅग रक्तसाठा लागतो. सध्या ५० बॅग असून हा साठा ५ दिवस पुरेल. त्यामुळे रक्तदांत्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आल्याचे घाटीतील डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले. दत्ताजी भाले रक्तपेढीचे पॅथॉलाजिस्ट मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले की उन्हामुळे रक्तदात्याची संख्या कमी झाली आहे. आठवडाभर पुरेल इतका साठा शिल्लक आहे. विशेषतः तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करावे. रक्तदानाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी एमजीएममध्येही ३ दिवसांचा साठा एमजीएममध्ये सध्या ९० युनिट आहेत. सध्या ४० ते ४५ युनिट रोज लागतात. बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, अपघातातील जखमींसाठी रक्ताची गरज लागते. त्यामुळे रक्तपुरवठा न झाल्यास ऑपरेशन पुढे ढकलावे लागतील. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घ्यावीत. – आशितोष देव,जनसंपर्क अधिकारी, एमजीएम ब्लड ऑपरेशनवर परिणाम होईल घाटीत ३ दिवस पुरेल इतकाच साठा आहे. रक्तपुरवठा न झाल्यास त्याचा परिणाम ऑपरेशनवरदेखील होईल. त्यामुळे रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे. त्याचा फायदा रुग्णांना होईल. – डॉ. भारत सोनवणे, प्रमुख, घाटी रक्तपेढी”
