काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-29t17_1777462331.png




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला या प्रकरणी विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. तर भाई जगताप यांनी काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देईल असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापैकी आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली. सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आपले पत्ते अजून उघड केले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कुणाला उमेदवारी देणार? याविषयी उत्सुकता लागली आहे. पण विरोधी बाकावरील ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रंगणांगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पण आता काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. काय म्हणाले भाई जगताप? काँग्रेस नेते भाई जगताप या प्रकरणी बोलताना म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या दिल्लीत आहेत. ते आमच्या नेत्यांशी चर्चा करून विधान परिषदेच्या निवडणुकीसंबंधी योग्य तो निर्णय घेतील. उद्या अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणी जे काही आहे तोपर्यंत स्पष्ट होईल. या प्रकरणी एवढे अस्वस्थ होण्याची काहीच गरज नाही. आम्ही अस्वस्थ नाही. आम्ही स्वस्थ आहोत. काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी हा विषय खूप मोठा आहे. हा विषय एवढा तकलादू नाही. आमचे प्रांताध्यक्ष दिल्लीतच आहेत. या सगळ्या घडामोडी होत असताना आम्ही सर्व जबाबदार आहोत. या जबाबदारीनेच सगळ्या गोष्टी होतील. आतापर्यंत याबाबतीतची अधिकृत माहिती किंवा घोषणा हे प्रांताध्यक्षच करू शकतील. मी किंवा इतर कुणीही करू शकणार नाही. पण माझ्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष कदाचित या निवडणुकीत आपला उमेदवार देईल. काँग्रेसला विश्वासात घेतले नाही – वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी ठाकरे गटावर अंबादास दानवेंचे नाव विचारात घेताना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, आज शिवसेना ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करताना त्यांनी काँग्रेसशी कोणतीही चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवली असती तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता. आमचे तसे ठरलेही होते. पण आता दुसरेच नाव समोर आले. मी यासंबंधी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली. मी त्यांना तुमच्याशी या नावासंदर्भात चर्चा झाली काय? असे विचारले. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. आता दिल्लीहून मुंबईत परतलेत. मी त्यांच्याशी पुन्हा चर्चा करेन. त्यानंतर पक्षाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तूर्त ठाकरे गटाने आमच्याशी या प्रकरणी कोणतीही चर्चा केली नाही. उद्या राज्यसभेची निवडणूक आहे. त्या संदर्भातही स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, ही जागा शिवसेना लढवणार असेल, तर पुढची राज्यसभेची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे. आम्ही ही जागा सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवले असेल, तर काँग्रेस उमेदवार देईल. उद्धव ठाकरेंवर एकमत होते, पण आता नवे नाव समोर पत्रकारांनी महाविकास आघाडीतील या वादामुळे भाजप आपला अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे असा प्रश्न वडेट्टीवारांना केला. त्यावर ते म्हणाले, ते काय करतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी असे ठरले आहे. शरद पवारांच्या बाबतीत एकमत झाले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत महाविकास आघाडीचे एकमत होते. पण एखादे नवे नाव समोर आले असेल आणि त्यावर चर्चा झाली नसेल, तर ते योग्य वाटत नाही. चर्चेतून मार्ग काढावा अशीच आमची इच्छा होती. या प्रकरणी आमच्याशी किमान चर्चा व्हावी अशी आमची रास्त अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आमच्याशी चर्चा न करता ते नाव घोषित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले होते उमेदवार देण्याचे संकेत उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार नसतील तर काँग्रेस आपला उमेदवार देईल अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते तिथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात ते या मुद्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पक्षाचा निर्णय जाहीर करतील असा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणआले, राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळी मविआच्या सर्व पक्षांनी शरद पवारांच्या नावाला मान्यता दिली होती. त्याचवेळेला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आम्ही सर्वांनी विधान परिषदेच्या निवडणुकीला मविआकडून उद्धव ठाकरे असावे, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या पक्षाने कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली असेल तर महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे असू. उद्धव ठाकरे असावेत अशी मागणी होती, पण त्यांच्या पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला असेल तर आम्ही पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ. शरद पवारांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर रणनीती बदलण्याचा विषयच येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed