आंबेडकर चळवळीतील घटक एकत्र न आल्यास पक्षविस्तार करणार:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन, एकत्रीकरणाचे प्रयत्न अयशस्वी
![]()
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, जर आंबेडकर चळवळीतील सर्व घटक एकत्र येत नसतील, तर आपल्या पक्षाचा वेगाने विस्तार करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. आंबेडकरी समाज सर्व गटांनी एकत्र यावे अशी इच्छा बाळगून आहे आणि त्यासाठी अनेक प्रयत्नही झाले आहेत, असे आठवले यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे, मोहन जगताप, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, प्रवीण ओव्हाळ, विशाल शेळके, राजेश गाडे, ऋषिकेश गवळी, संजय खडसे, सुनिल जाधव आणि सुधीर वाघमोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाज घटकांना एकत्र आणणारा पक्ष आहे. पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा मुळे यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्यावर पक्षाच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुळे यांच्या माध्यमातून मराठा आणि दलित समाजाला एकत्र जोडण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील, असे आठवले यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतर समाजात मोठे परिवर्तन झाले असून, संविधानामुळे समाज एकसंध राहिला आहे. त्यामुळे भारतात नेपाळ किंवा बांगलादेशसारखी अराजकाची स्थिती निर्माण होऊ शकत नाही, असे आठवले म्हणाले. सामाजिक स्तरावर जातीभेद स्पष्टपणे दिसत नसले तरी, काही ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना अजूनही घडत आहेत. त्यामुळे संपूर्ण सामाजिक परिवर्तनासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. देशभरात पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील असतानाही, महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली. त्यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध महामंडळांमध्ये ५० सदस्य आरपीआयला मिळावेत, अशी आग्रही मागणी केली. आठवले यांनी काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या. पुणे येथील आंबेडकर भवनच्या पाठीमागील जागा स्मारकासाठी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी, अशी त्यांची मागणी होती. तसेच, कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाजवळ विजय स्मारकासाठी सरकारकडून २०० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले. विजय स्तंभाच्या जागेची पाहणी राज्याच्या समाज कल्याण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाली आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन स्मारकासाठी जागा अधिग्रहित करावी, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. धम्मचक्र दिनी 14 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या सातारा येथून सामाजिक समरसता मार्च काढण्यात येणार असून तो महाराष्ट्रभर जाईल आणि त्याचा समारोप पुण्यात करण्यात येईल, असेही आठवले यांनी नमूद केले. सातारा येथे डॉ आंबेडकर यांच्या मातोश्रींचे स्मारक उभारले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वक्तव्य करावीत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता,’ या पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने संतापलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी संपादकांना शिवीगाळ करून धमकीही दिली. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आठवले म्हणाले की, पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करताना प्रकाशकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?’ असा बदल करण्यास हरकत नव्हती. मात्र, संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.
