उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज:ठाकरेंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी दहावा उमेदवार उतरण्याची रणनिती
![]()
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दहावा उमेदवार उभा करण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि आमचे दोन उमेदवार निवडून येतील याबद्दल आम्हाला खात्री आहे. मात्र, उरलेली मते आणि काही अपक्ष तसेच लहान पक्षांचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परिस्थिती अनुकूल वाटल्यास दहावा उमेदवार मैदानात उतरवण्याचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. या उमेदवारीचा संबंध कोणत्याही एका नेत्याशी नसून, ती पूर्णपणे संख्याबळाच्या आधारावर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबतही अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, स्वतः उद्धव ठाकरे यांची या निवडणुकीत उतरण्याची फारशी इच्छा नसल्याचे बोलले जात आहे. जर त्यांनी नकार दिला, तर शिवसेनेकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे किंवा विनायक राऊत यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे. निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा फरक आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान म्हणून त्यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा विचार होऊ शकतो, पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी तशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून आणण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. दुसरीकडे, महायुतीचे संख्याबळ पाहता त्यांना आठ जागा सहज मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मविआकडे केवळ एक जागा राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर शिंदे गटाने दहावा उमेदवार उभा केला, तर त्या एकमेव जागेसाठी मोठी चुरस निर्माण होऊ शकते. यामुळे महाविकास आघाडीच्या गणितांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहावा उमेदवार निवडणुकीतील गेमचेंजर एकूणच, विधान परिषद निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखताना दिसत आहे. शिंदे गटाचा संभाव्य दहावा उमेदवार हा निवडणुकीतील गेमचेंजर ठरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. आता उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात, शिंदे गट प्रत्यक्षात दहावा उमेदवार देतो का, आणि अंतिम निकालात कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
