केईएम रुग्णालयाच्या नामांतरावर प्रशासनाकडून हिरवा कंदील:ठाकरे गटाच्या विरोधानंतरही प्रक्रिया पूर्ण, मंत्री लोढांच्या मागणीला यश
![]()
मुंबई महानगरपालिकेच्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल. रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ मार्च २०२६ रोजी महापौरांना आणि आरोग्य समितीला पत्र लिहून मागणी केली होती. शुक्रवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात आली. समितीच्या निर्णयावर अंतिम मोहोर उमटवण्यासाठी तो पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून संमती दिली आहे. स्वदेशी विचारांचा आग्रह १९२६ मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेचे नाव ब्रिटीश राजाच्या नावावर होते. बदलत्या काळानुसार आणि स्वदेशी विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या संस्थेला भारतीय संस्कृतीशी निगडित नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. विशेष म्हणजे, ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नाव सुचवताना मूळ ‘KEM’ हे संक्षिप्त रूप बदलणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. राजकीय संघर्षाकडे दुर्लक्ष या नामांतराच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला होता. मुंबईचा इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूंची ओळख पुसली जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र, प्रशासकीय पातळीवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, आरोग्य समितीचा निर्णय अंतिम राहील. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हे ही वाचा… बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा…
