शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा:शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील- चंद्रशेखर बावनकुळे
![]()
नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे. यावर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे आणि या देशाचे असे संस्कार आहेत की माफी मागितली की लोक माफ करून टाकतात. त्यामुळे मला असे वाटते की त्यांनी माफी मागितली आहे तर आपणही मोठ्या मनाने त्यांना माफ केले पाहिजे. शिवप्रेमी सुद्धा मोठ्या मनाचे असतात पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला एवढेच म्हणायचे आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही थोर पुरुषांच्याबद्दल, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतिहासात विविध टिप्पणी केली आहे. मात्र, खरा इतिहासच लोकांच्या समोर ठेवला पाहिजे. कोणी पण पुस्तक लिहिते, गोष्ट लिहितात आणि अर्धे सोडून निघून गेले आणि त्यांनी लिहिलेल्या गोष्टी सुरूच आहेत. त्या आधारावर कोणतेही स्टेटमेंट करणे चुकीचे आहे. तसेच शिवप्रेमी सुद्धा मोठ्या मनाचे असतात, तेही माफ करतील. धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या 4 मुलांच्या वक्तव्यावर काय म्हणाले बावनकुळे? धीरेंद्र शास्त्री यांनी चार मुलं जन्माला घाला आणि चौथे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाला द्या, असेही वादग्रस्त विधान केले होते. यावर विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चार मुलांचे जे काही स्टेटमेंट आहे, आता पूर्ण भाषण जर पाहिले तर त्यांनी असे म्हटले आहे की, जेव्हा देशावर संकट येते, समाजावर संकट येते किंवा व्यक्तीवर संकट येते तेव्हा सर्वसामान्य जनता घाबरून पळून जाते. कारण ती मानसिकता असते त्यावेळची. अशा वेळेस राष्ट्रीय स्वयं सेवक संघ त्या आपत्तीसोबत, त्या संकटासोबत झुंज देतात आणि लोकांची मदत करतात. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, त्यांची भावना हीच होती की स्वयंसेवक समाजात जास्त असतील तर सरकारसोबत स्वयंसेवक सुद्धा समाजाला मजबुतीने सांभाळण्याचे काम करेल. त्यामुळे आपल्या परिवारातील एक व्यक्ती संघात असायला पाहिजे, अशी भावना त्यांची होती. फक्त बोलण्याचे टोन वेगळे होते, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
