Tarabai Modak Biography in Marathi
शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज AI मुळे ज्ञानाच्या कक्षा अभूतपूर्व वेगाने रुंदावत आहेत. समाजात घडणाऱ्या शिक्षणक्रांतीमुळे समाजमन घडले, विचार
.
प्राथमिकपूर्व शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतची ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी अनेकांच्या पायांची बोटे ठेचली गेली. भारतात बालवाडी, अंगणवाडी व बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना रुजवणाऱ्या ताराबाई मोडक यांचेही कार्य याच संघर्षमय परंपरेतील एक तेजस्वी पर्व आहे. ‘धुरंधर’मध्ये आज आपण याच शिक्षणतपस्विनीचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत.

ताराबाई मोडक ह्या शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1892 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव केळकर, तर आईचे नाव उमाबाई होते. त्या 1914 साली बीए झाल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांची ओळख अमरावतीच्या कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी झाली. पुढे त्यांनी नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. कृष्णा मोडक वकील होते. त्यांना प्रभा नामक एक मुलगी होती. पुढे कृष्णा व्यसनाधीन झाले. त्यामुळे या दाम्पत्याने आपल्या वाटा वेगळ्या केल्या. त्यानंतर ताराबाईंनी अमरावती सोडली.
महाराष्ट्र सोडून गुजरातेत स्थलांतर
ताराबाईंनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांची गुजरातच्या राजकोट येथे सरकारी मुलींच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्यपदी नियुक्ती झाली. त्यांच्या रुपाने एखाद्या भारतीय महिलेला पहिल्यांदाच या महाविद्यालयात असा मान मिळाला होता. तिथे त्यांनी 1921-23 अशी 2 वर्षे प्राचार्य म्हणून नोकरी केली. या कालावधीत त्यांनी गुजराती भाषा आत्मसात केली. यावेळी त्यांचे लक्ष गिजुभाई बधेका यांच्या बालशिक्षणाच्या प्रयोगांकडे वेधले गेले. त्या बधेका यांचे भावनगरचे बालमंदिर व त्यांचे प्रयत्न पाहून फारच प्रभावित झाला. त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण जीवन बालशिक्षणाला वाहून घेण्याचा निर्धार केला. त्यानुसार, राजकोट येथील चांगला पगार, गाडी, बंगला, मानसन्मान आदींचा त्याग करून त्यांनी गिजुभाईंच्या प्रयोगात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
ताराबाई व गिजुभाई यांनी 1923 ते 1932 या 9 वर्षांत संयुक्तपणे बाल शिक्षण क्षेत्रात संशोधनपूरक काम केले. या माध्यमातून त्यांनी भारतात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया घातला. या दोघांना अडीच ते 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांसाठी बालशाळा असण्याची गरज वाटली. त्यासाठी त्यांनी त्याच्या कार्यपद्धतीचा शोध सुरू केला. ती कार्यपद्धत स्वदेशातील आर्थिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक परिस्थितीशी मिळतीजुळती असण्यास हवी असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी मुलांसाठी गोष्टी, गाणी, बडबड गीते, अभिनय गीते, लोकगीते असे विविध प्रकारचे साहित्य लिहून ते प्रकाशित केले. तो बालसाहित्याचा प्रमाणित नमुनाच ठरला.
आज अंगणवाडी ही शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानली जाते. या अभिनव संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. त्यांनी 1936 साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. त्यानंतर 1948 पर्यंत त्यांनी मुंबईतील दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नामक संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या माँटेसरी पद्धतीचा अवलंब करून त्यांनी हे बालशिक्षण ग्रामीण व आदिवासी भागांत पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यांनी शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी कुरणशाळा सारखे यशस्वी प्रयोग राबवले.
ताराबाईंनी शिक्षण पत्रिका हे मासिक सुरू केले. त्याद्वारे समाजाचे बाल संगोपनाविषयी प्रबोधन केले. या प्रकरणी प्रदर्शने, पालक मेळावे, सभा, परिषदा, संमेलने आयोजित करून समाजात बालशिक्षणाविषयी कुतूहल निर्माण केले.

दक्षिणामूर्तीतील ‘गिता’ पद्धत
ताराबाई व गिजुभाई यांच्या मनात माँटेसरी पद्धतीविषयी भक्तिभाव होता. पण त्यानंतरही प्रत्यक्ष प्रयोग करताना मात्र गिजुभाई व ताराबाई यांनी आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय परिस्थितीचा साकल्याने विचार करून त्यात ते योग्य ते फेरफार केले. त्यानंतर ती पद्धती त्यांनी भारतात अंमलात आणली. या दोघांनी मिळून प्रचारात आणलेल्या या पद्धतीला दक्षिणामूर्तीत ‘गिता’ पद्धत म्हणत असत. कारण गिजुभाई आपल्या लेखाच्या खाली ‘गि’ माणून सही करत, तर ताराबाई ‘ता’ अशी सही करीत.
गिजुभाई म्हणजे काकासाहेब कालेलकरांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘बालसाहित्याचा ब्रह्मा’. ताराबाईंनी आपल्या आयुष्यातील 9 वर्षे त्यांच्या सहवासात दक्षिणामूर्तीत घालवली. त्या याविषयी सांगतात, मी विलायतेत गेले असते, तर तिकडून एखादी पदवी घेऊन आले असते. जमेल तेवढे शिक्षणकार्य मी कुवतीनुसार केले असतेच. पण गिजूभाईंचे जीवन पाहून मी जे ज्ञान मिळविले, ते मला इतर कुठेही खरेदी करता आले नसते.
महात्मा गांधींची पाचगणीत घेतली भेट
ताराबाई 1936 साली महाराष्ट्रात परतल्या. त्यांनी मुंबईतील दादर येथे आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहारची स्थापना केली. या संस्थेची मराठी व गुजराती या दोन्ही भाषांत बालमंदिर होते. तत्कालीन समाज हा गरिबीने पिंजलेला होता. त्यामुळे हे महागडे बालशिक्षण आमच्या गरीब देशाला परवडणार आहे का? भारत मुख्यतः खेड्यांचा देश आहे, तिथपर्यंत हे शिक्षण कसे पोहोचवणार? गावखेड्यातील लोकांना ते पेलवेल का? तुम्हाला खेड्यांत अशा बालशाळा चालवून त्या यशस्वी करून दाखवता येतील का? असे विविध प्रश्न ताराबाईंना भंडावून सोडत होते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा खेड्यांकडे वळवला. त्यांनी पाचगणी येथे महात्मा गांधी यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे बालशिक्षणाविषयीचे कार्य व आपले विचार मांडले. गांधींनी त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

महात्मा गांधी म्हणाले, ताराबाई, तुमच्या बालशिक्षणाला माँटेसरी पद्धती व त्यांची साधने आहेत. ती साधने फार महाग असतात. तुम्ही बालशिक्षणाचे कार्य करत आहात, तेव्हा त्यासाठी भारतीय पार्श्वभूमी तयार करा. भारतातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीशी मिळतीजुळती अशी बैठक तयार करा. शैक्षणिक साधने स्वस्त व स्थानिक कारागिरांना तयार करता येतील, शिक्षकांचा त्यात जास्तीत जास्त सहभाग असेल असे पाहा. थोडक्यात काय तर इटलीतील मॅडम माँटेसरीची तत्त्वे स्वीकारा, पण त्याला भारतीय स्वरुप द्या. भारतासाठी भारताची बालशिक्षण पद्धत स्थापन करा. तुमचे हे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी ठरेल. स्वतंत्र भारतातील भावी पिढ्यांमध्ये सुसंस्कृत व आदर्श नागरीक तयार करण्याचे पायाभूत शिक्षण म्हणून ही बालशिक्षण पद्धत योग्य ठरेल, असे गांधी म्हणाले.
…अन् ताराबाईंनी खेड्यांकडे वळवला मोर्चा
महात्मा गांधींच्या आशीर्वादाने ताराबाईंच्या उत्साहाला उधाण आले. त्यांनी आपले लक्ष खेड्यांकडे वळवले. त्यांनी त्यांचे सहकारी शेष नामले व सरला देवधर यांच्यावर शिशुविहार शिक्षण केंद्राची जबाबदारी सोपवली. त्यांनी अनुताई वाघ या आपल्या कार्यकर्तीला सोबत घेऊन ठाणे (आताचा पालघर जिल्हा) जिल्ह्यातील बोर्डी या गावी बस्तान बसवले. तिथ 24 डिसेंबर 1945 रोजी त्यांनी नूतन बालशिक्षण संघाच्या ग्राम बाल शिक्षा केंद्र या नव्या संस्थेची स्थापना केली. या केंद्राच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे आले होते. ताराबाईंनी 1945 ते 1956 या एका तपाच्या काळात बालशिक्षणाविषयी विविध प्रयोग केले. त्यांनी बोर्डीत अध्यापन मंदिराची स्थापना केली.
बालवाडी अन् अंगणवाडी शब्द कसा तयार झाला?

ताराबाईंनी बालमंदिराच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार केला. बोर्डी येथील अध्यापन मंदिर हे बहुभाषीय व बहुप्रांतीय अध्यापन मंदिर होते. गुजरात, केरळ, बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, काश्मीर या प्रांतातून शिक्षण या अध्यापन मंदिरात प्रशिक्षणासाठी येत होते. ताराबाईंनी स्वतः प्रशिक्षण घेऊन नूतन बाल शिक्षण पद्धती प्रस्थापित केली. त्यातून ग्रामीण बालशिक्षणाची मजबूत बैठक तयार झाली. बालवाडी, अंगणवाडी या शब्दांची उत्पत्ती बोर्डीतच झाली.
गुजरातचे शिक्षणतज्ज्ञ जुगतरामभाई दवे हे बोर्डीला ताराबाईंचे काम पाहण्यासाठी नेहमीच येत असत. ते एकदा ताराबाईंना म्हणआले, बोर्डीला चिकूच्या वाड्या आहेत. तुमच्या या बालमंदिराला जर बालवाडी म्हटले तर कसे वाटेल? ताराबाईंना तो शब्द आवडला. त्यांनी बालमंदिराचे नाव बालवाडी असे केले. लहान मुलांची शाळा सुरुवातीच्या काळात आदिवासी घराच्या अंगणात भरत असे. त्यालाही अंगणवाडी असे नाव पडले.
इटलीच्या दौऱ्यावर जाऊन मांडले शिक्षण कार्य
22 ऑगस्ट से 29 ऑगस्ट 1949 या कालावधीत माँटेसरीच्या मायभूमीत म्हणजे इटलीच्या सॅन रॅमो नामक शहरात 8 वे आंतरराष्ट्रीय माँटेसरी संमेलन भरले होते. जनताजनार्दनाने दिलेल्या भरपूर व उत्स्फूर्त आर्थिक देणगीमुळे 15 ऑगस्ट 1949 रोजी रात्री 11 च्या विमानाने ताराबाई युरोपला जाऊ शकल्या. या संमेलनासाठी तब्बल 20 देशांतील 500 प्रतिनिधी आले होते. त्यापैकी 6 भारतीय प्रतिनिधींत ताराबाई होत्या. या परिषदेत ताराबाईंनी हिंदुस्थानात चाललेले नूतन बालशिक्षण संघाचे कार्य हा निबंध वाचला. या संमेलनाचा सविस्तर वृतांत व इतर 9 देशातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा इतर शिक्षणसंस्थाचे तपशीलवार वर्णन ताराबाईंनी शिक्षणपत्रिकेतील लेखन स्वरूपाने वाचकांना कळवले.

1948 मध्ये मुंबईत झालेल्या बालशिक्षण शिबिराच्या धर्तीवर ग्रामीण परिस्थितीला अनुसरून 7 दिवसांचे बालशिक्षण शिबिर मे 1950 मध्ये डहाणू व उंबरगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने बोर्डीस ग्रा. बा. शि. केंद्राने भरवले. यामुळे या तालुक्यांत बालशिक्षणाच्या प्रचारात चांगली मदत झाली.
कुरणशाळा, एक क्रांतिकारी पाऊल
मोठ्या वयाच्या आदिवासी मुलांना वर्षातील काही महिने गुरे चारणे अनिवार्य होते. अशा मुलांच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था करण्यासाठी ताराबाईंनी कुरणशाळेचा अभिनव प्रयोग 1958 मध्ये सुरू केला. या प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून कायमची नोंद झाली आहे. मुले शाळेत येत नसतील तर शाळेने मुलांकडे जावे, हा या प्रयोगात पवित्रा घेतला गेला.
कुरणशाळा म्हणजे निसर्गाच्या मांडीवर खेळणाऱ्या निसर्गबाळांसाठी काढलेली निसर्गशाळा होती. त्यासाठी हिरव्या रानाची पाटी बनवली. कुरणशाळेचा प्रयोग विकासवाडी प्रयत्नात स्थान मिळवून बसला. 1974 साली भारत सरकारने कुरणशाळा व Meadow School ही या प्रयोगाचा आढावा घेणारी पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतली व प्रकाशित केली. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत श्रीमती सुलभा पाणंदीकर यांनी ताराबाई व त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेला नव्या शाळेचा हा प्रकार म्हणजे जीवन शिक्षणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे असे मत व्यक्त केले.
ताराबाई आणि बालशिक्षण या स. आ. केळकर लिखित पुस्तकाच्या प्रस्तावनेत काका कालेलकर म्हणतात, मी जर हिंदुस्तानचा शिक्षणाकार्याचा इतिहास लिहावयास बसलो तर एका ‘नव्या युगाचा आरंभ’ म्हणून ताराबाईंच्या कुरणशाळेतला एक स्वतंत्र अध्याय घेईन. विद्यार्थ्यापर्यंत शाळेनेच पोहोचण्याचे हे सूत्र खरोखरच क्रांतिकारी आहे, युगांतरकारी आहे. पण याचा प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याची हिंमत ताराबाईनी केली.
विकासवाडी अध्यापन मंदिर

जून 1957 पासून विकासवाडी अध्यापन मंदिर कोसबाड येथे सुरू करण्यात आले. आदिवासी भागातील प्राथमिक शाळांत ज्या शैक्षणिक सुधारणा व्हावयास हव्यात, त्या पासून आणण्यासाठी शिक्षक तयार करावेत अशी मूळ कल्पना होती. 1958 पासून ग्रामसेविका विद्यालय ताराबाईंच्या देखरेखीखाली केंद्रीय समाजकल्याण बोर्डाने सुरू केले. ताराबाई मोडक यांच्या चरित्रकार पद्मा फाटक म्हणतात, बालशिक्षणाचा जो विराट प्रयोग आपल्या आयुष्यातील 50 हून अधिक वर्षे ताराबाईंनी केला, त्या प्रयोगाची सांगता म्हणजे त्यांची ही कोसबाडच्या जंगलातल्या टेकडीवरची विराणी, वर्धिष्णू संस्था-विकासवाडी होय.
मोलमजुरी करणाऱ्यांसाठी रात्रशाळा
ताराबाईंनी दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या मुलांसाठी रात्रशाळा निर्माण केली. कमवा व शिकवा या सूत्राचा आधार घेऊन अर्थार्जनाचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योगालय सुरू केले आणि हे उद्योग तेथील भौगोलिक परिस्थितीशी पूरक असे होते. पळसाची पाने गोळा करणे, गवतपासून औषधाच्या बाटल्यांना आवरण तयार करणे, सुतारकाम, विणकाम, छत्र्या बनवणे, खेळणी, खडू, व उदबत्या तयार करणे आदींच्या माध्यमातून ताराबाईनी शिक्षण जीवनाभिमुख व व्यवसायाभिमुख बनवले. मुलांना बोन्साय करू नका. त्यांना वटवृक्षासारखे वाढू द्या, असे ताराबाई नेहमी म्हणत.
यशवंतरावांनी 1 लाख रुपयांची थैली दिली
शासनाने 1962 साली ताराबाईंचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवशी 1 लाख रुपयांची थैली महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांना अर्पण केली. त्यांचा जाहीर सत्कार केला. सरारने त्यांच्या कुरणशाळाच्या अनोख्या प्रयोगाचे पुस्तक प्रकाशित करून त्यांच्या कार्याला देशभर प्रसिद्धी दिली. स.ह. देशपांडे यांनी त्यांच्या कार्यावर एक संशोधनात्मक निबंध लिहिला. हा निबंध अमेरिकेतील इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संघटनेने 1979 साली पुस्तक रुपाने प्रकाशित केला.

शिक्षण शास्त्रज्ञ चित्रा नाईक यांनी 1978 साली युनिसेफसाठी ग्रोइंग अॅड कोसबाड हिल नामक पुस्तक लिहिले. यामुळे ताराबाईंचे शैक्षणिक कार्य जगभरात पसरले. ताराबाईंच्या कोसबाड येथील शिक्षणकार्याला भारतीय व जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. त्यांचे 1973 साली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा त्यांच्या बोर्डीपासूनच्या सहकारी व शिष्या अनुताई वाघ यांच्या खांद्यावर आली. त्यांनी ताराबाईंचे कार्य जोमाने पुढे नेले.
धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा…
