नांदेड – शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लोहा येथील शेतकरी बालाजी कोटगीरे यांच्या शेतावर जलसंधारण कामांतर्गत विकसित करण्यात आलेल्या बांबू बेटाची पाहणी केली.
शेतकरी बालाजी कोटगीरे यांनी सन २०२३ मध्ये उन्हाळ्यात त्यांच्या शेतातील नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण केले. या नाल्याची लांबी ५०० फूट, खोली ५ फूट आणि रुंदी ८ फूट आहे. नाल्यातील गाळ व माती दोन्ही बाजूस टाकण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात ही माती पुन्हा वाहून नाल्यात जाण्याची शक्यता होती. या समस्येवर उपाय म्हणून श्री. कोटगीरे यांनी नाल्याच्या बांधावर ५×५ फूट अंतरावर बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी आलोव्हेरी जातीच्या बांबू रोपांची लागवड केली. बांबू लागवडीपूर्वी रोपांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली. रोपांची नियमित काळजी व गरजेनुसार पाणी दिल्यामुळे बांबूची वाढ झपाट्याने झाली. सध्या अवघ्या तीन वर्षांत प्रत्येक बांबू बेटामध्ये १५ ते २० काठ्यांची वाढ झाली असून बांबूची जाडी २ ते २.५ इंच आणि उंची २० ते २५ फूट इतकी झाली आहे.


या प्रयोगामुळे मागील काही वर्षांत:
* बांध खचला नाही किंवा फुटला नाही
* मातीची धूप झाली नाही
* नाल्याचे पाणी शेतात आले नाही
* शेतातील सुपीक माती वाहून गेली नाही
* बांधावर गवत व अनावश्यक झुडपे वाढली नाहीत
यामुळे जलसंधारणाचा उद्देश साध्य होण्याबरोबरच बांधावर दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी अंदाज व्यक्त केला की १५० बांबू रोपांमधून पुढील काळात दरवर्षी सुमारे १५०० बांबू काठ्या उत्पादन मिळू शकते. प्रति काठी अंदाजे ४० रुपये दराने सुमारे ६० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे. बांबू लागवडीच्या ५ वर्षांनंतर हे उत्पन्न पुढील ५० ते ८० वर्षे टिकाऊ स्वरूपात मिळू शकते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संपूर्ण बांबू बेटाची पाहणी करून या उपक्रमाची माहिती घेतली.

Post Views: 42
