![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या बहुचर्चित हत्या प्रकरणाचा निकाल आज सीबीआय न्यायालयाने दिला. यामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा ओमराजे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत ओमराजेंनी याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर भाष्य करताना ओमराजे म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघात जाऊन, कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच पुढील राजकीय निर्णय घेणार आहे.” “उद्धव साहेबांचे मन मोठे, पण…” : आदित्य ठाकरेंचा इशारा ओमराजे निंबाळकर यांच्या या बदलत्या राजकीय भूमिकेवर आदित्य ठाकरे यांनी त्यांना घरवापसीची साद घालतानाच एक प्रकारे कडक इशाराही दिला आहे. “परवा झालेल्या बैठकीला कोण उपस्थित होते, हे आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. उद्धव साहेबांचे मन खूप मोठे आहे; त्यामुळे ज्यांना पक्षात परत यायचे आहे, त्यांचे स्वागतच आहे. परंतु, जे पक्षाच्या विरोधात उघडपणे जातील, त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल,” असे आदित्य ठाकरे म्हणाले. ओमराजेंशी सध्यातरी कोणताही संपर्क झाला नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांचे सध्या तळ्यात-मळ्यात सुरू असो, पण त्यांनी डुबायला नको, हे आता पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून आहे.” अमित शाहांच्या विधानावर कडाडून टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात “शिवसेना एकच असून ती एकनाथ शिंदेंचीच आहे, आता तो केवळ गट उरलेला नाही,” अशी टीका ठाकरे गटावर केली होती. या विधानाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले, “असल्या फालतू गोष्टींकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही. शिवसेना नेमकी कोणाची आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जनतेला चांगलेच ठाऊक आहे. अमित शाह यांच्या स्वागतासाठी केवळ गुलामांनी बॅनर्स लावले आहेत. ज्यांना माझे आजोबा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय जीवदान दिले, तेच लोक आज शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवायला निघाले आहेत. हे संपूर्ण जग पाहत असून, यामुळेच आज जगभरात भारताची लोकशाही धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे.” आता ‘ऑपरेशन तुडवा’ होणार! खासदार आणि आमदार फोडण्याच्या महायुतीच्या राजकारणावर बोलताना आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केला. “राज्यात सध्या एकच खरी शिवसेना आहे, तर दुसरी केवळ गुलामांची टोळी आहे. एका चोराला मुख्यमंत्री बनवायचे आहे, म्हणूनच हा सगळा खेळ सुरू आहे. संजय राऊत यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे, आता कुठे ना कुठे ‘ऑपरेशन तुडवा’ नक्कीच पाहायला मिळणार आहे,” असा इशारा देत त्यांनी आगामी काळात संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत दिले.
ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे
