कोर्टाचा दिलासा मिळाल्यावर रोहित पवारांची पोस्ट:म्हटले- आरोपांतून वगळत ED कारवाईतून सुटका, "घायल हूँ, इसलिए घातक हूँ" असा इशाराही दिला
![]()
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर आता या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे. न्यायालयाने या प्रकरणात रोहित पवार यांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ईडीने याआधी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये 2002 अंतर्गत रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईत बारामती अॅग्रो या कंपनीशी संबंधित 50 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील जमीन, साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता. ईडीच्या मते, ही संपत्ती कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या कथित अनियमित लिलाव प्रक्रियेतून मिळवण्यात आली होती. या प्रकरणाची सुरुवात 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यापासून झाली होती. त्यात सहकारी साखर कारखाने अत्यंत कमी किमतीत खासगी कंपन्यांना आणि संबंधित व्यक्तींना विकल्याचा आरोप होता. या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन करून काहींना अनुचित फायदा करून देण्यात आल्याचेही ईडीने म्हटले होते. या तपासादरम्यान एकूण 121.47 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच ही कारवाई राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप केला होता. मी काही लोकांचे ऐकले नाही म्हणूनच माझ्यावर ही कारवाई झाली, असे त्यांनी याआधी म्हटले होते. मात्र, ईडीचे अधिकारी केवळ आदेशांचे पालन करत असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयावर विश्वास व्यक्त केला होता. आता न्यायालयाने या प्रकरणात दिलासा दिल्यानंतर रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर भावनिक आणि ठाम प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे. अखेर न्यायालयाने मला या आरोपांतून वगळत ईडीच्या कारवाईतून मुक्त केले. याबद्दल न्यायालयाचे मनापासून आभार, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं, हे पुन्हा सिद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. घायल हूँ, इसलिए घातक हूँ याचबरोबर त्यांनी पुढील राजकीय भूमिकेबाबतही सूचक इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागला, पण आता पुढे काय करायचे हे वेळच ठरवेल. ‘घायल हूँ, इसलिए घातक हूँ’, असे म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. या प्रकरणातील या नव्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
