12 मेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग; कोणाला मिळणार तिकीट?:कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? पहा संपूर्ण यादी

0
730-x-548-new-2026-04-22t102514255_1776833889.jpg




महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मोठी हालचाल सुरू झाली आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे अधिकच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. एक उमेदवार विजयी होण्यासाठी साधारण 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे बहुमत असल्याने त्यांचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ मर्यादित असल्याने त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. भाजपकडून अनेक नेते सक्रिय भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक नेते सक्रिय झाले आहेत. माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी ही नावे सध्या चर्चेत आहेत. यापैकी काहींना संधी देताना पक्षाकडून जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंतिम यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतून नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार दरम्यान, या निवडणुकीचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक होणार असून एका जागेसाठी पोटनिवडणूकही घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यासाठी आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून ही प्रक्रिया देखील महत्त्वाची ठरणार आहे. मोठे राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता याचबरोबर, विधान परिषदेतील काही विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरली आहे. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार की जुन्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकूणच, विधान परिषदेच्या निवडणुकीने राज्यातील राजकारण तापवले असून पुढील काही दिवसांत मोठे राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed