El Nino Effect | महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एल निनोचे सावट अन् अवकाळीचा कहर, सरकारने दिल्या महत्त्वाच्या सूचना
El Nino Effect | एका बाजूला आगामी काळात पावसाळ्यात मोठा खंड पडून भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, अचानक आलेल्या अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, काही ठिकाणी वीज पडून दुर्दैवी जीवितहानी देखील झाली आहे. अशातच राज्यावर यंदा एल निनो (El Nino) या नैसर्गिक संकटाचे सावट असल्याने पावसाळ्यात मोठा खंड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत आता सरकारने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
जूनमध्ये सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर ऑगस्टपर्यंत पाऊस गायब राहण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने आतापासूनच पाणी बचतीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे कुठे दिलासा तर कुठे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
एल निनोचा सामना करण्यासाठी सरकारी उपाययोजना
एल निनोच्या संकटामुळे शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रावर होणारे परिणाम लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिकांना ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचा साठा पुरवण्यासाठी आतापासूनच पाणी जपून वापरण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात भीषण टंचाई टाळण्यासाठी पाणी कपात लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
अवकाळी पावसाचा जिल्ह्यागणिक आढावा
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूस (Palus) तालुक्यातील भिलवडी (Bhilwadi) परिसरामध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे उसाच्या शेतात पाणी साचले असून आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मराठवाड्यात लातूर (Latur) जिल्ह्यामध्ये ४२ अंशांवर गेलेल्या पाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र औसा (Ausa) शहरासह ग्रामीण भागात झालेल्या गारपीठ आणि पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील विठ्ठलवाडी (Vitthalwadi) येथे वीज पडून बबन लांडगे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या आठ दिवसांवर असताना ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
News Title: El Nino Effect Maharashtra Weather Unseasonal Rain Hit Maharashtra
