खून प्रकरणाने बिलोली तालुका हादरला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बिलोली (ता. बिलोली) : तालुक्यातील चिचाळा येथे घडलेल्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 ते 10.00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मारोती इधितदार (वय 30, रा. बडूर ता. बिलोली) यांना कौटुंबिक कारणावरून तिघांनी संगनमताने मारहाण केली. आरोपी नागोराव तुळशीराम शिंदे (सासरा), राम नागोराव शिंदे (मेहुणा) आणि गंगाधर नागोराव शिंदे (मेहुणा, सर्व रा. चिचाळा ता. बिलोली) यांनी मयताने आपल्या मुलीचे चांदीचे दागिने विकल्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली व काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले.
या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण इधितदार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचे नातेवाईक अशोक मारोती इधितदार (वय 43, रा. बडूर ता. बिलोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बिलोली येथे गुन्हा क्रमांक 79/2026 नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 352, 3(5) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post Views: 432
