अक्षय्य तृतीयेचा गोडवा, ६५०० क्विं. आंब्यांची खरेदी:आठवड्याभरात वाढली आवक; हापूस, केसरला सर्वाधिक मागणी; सर्वसामान्यांची ‘लालबाग''ला पसंती
![]()
प्रतिनिधी | नाशिकरोड अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि या दिवशी घरोघरी आमरस-पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. हाच मुहूर्त साधत नाशिकच्या बाजारपेठेत आंब्यांचा गोडवा चांगलाच दरवळला. यंदा अक्षय तृतीयेनिमित्त नाशिकमध्ये तब्बल साडे सहा हजार क्विंटल आंब्यांची विक्रमी विक्री झाली असून, यामध्ये हापूस आणि केसर आंब्याने बाजी मारली आहे. बाजार समितीत आवक वाढली नाशिक बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. सचिव निवृत्ती बागूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात सुमारे साडे पाच हजार क्विंटल हापूस आणि केसर आंब्याची आवक झाली. घाऊक बाजारात हापूस २०० ते ३५० रुपये (सरासरी ३०० रु.) तर केसर १५० ते २५० रुपये (सरासरी २०० रु.) प्रति किलो दराने विक्री झाला. किरकोळ बाजारात मागणी वाढल्याने ऐन सणासुदीला दरात किलोमागे ५० रुपयांची वाढ दिसून आली. लालबागचा आधार हापूस आणि केसरचे दर चढे असल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांनी लालबाग आंब्याला अधिक पसंती दिली. चवीला उत्तम आणि खिशाला परवडणारे दर असल्याने लालबागची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, उद्यापासून आंब्यांच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दरावर वातावरणाचे सावट अक्षय तृतीयेला मागणी प्रचंड होती, मात्र आता ढगाळ वातावरणामुळे आंब्यांच्या साठवणुकीवर परिणाम होत आहे. मागणी घटण्याची शक्यता असल्याने उद्यापासून दरात घसरण पाहायला मिळू शकते. – एयाज शेख, फळविक्रेता
