तापमान वाढीने राज्यात 900 मे.वॅ. वीज तुटवडा:वीजचोरी व थकबाकी असणाऱ्या भागांतच भारनियमन
![]()
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे कूलर आणि एसीचा वापर वाढला असून विजेच्या मागणीने ३१ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. महानिर्मिती, खासगी वीज कंपन्या आणि केंद्रीय वीज केंद्रांकडून वीज खरेदी करूनही ऐन सर्वाधिक मागणीच्या काळात (सायंकाळी) ९०० ते १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, महावितरणला गेल्या तीन दिवसांपासून (१६ ते १८ एप्रिल) सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आपत्कालीन भारनियमन करावे लागत आहे. ज्या निमशहरी वस्त्या किंवा ग्रामीण भागात विजेची चोरी आणि तांत्रिक गळती प्रचंड (साधारण ४२% ते ५८% पेक्षा अधिक) आहे तसेच वीज बिल वसुलीचे प्रमाण नीचांकी आहे, अशाच भागांचा या श्रेणीत समावेश होतो. यापूर्वी १३ एप्रिल रोजीही केवळ जी-३ फीडरवर सायंकाळी ६.४८ ते ७.१५ वाजेपर्यंत वीज कपात करण्यात आली होती. दिवसा दिलासा, सायंकाळी तूट सध्या दिवसाची विजेची गरज बऱ्याच अंशी सौरऊर्जेवर भागवली जात आहे. मात्र, सायंकाळी सौरऊर्जा उपलब्ध नसल्याने व मागणी वाढत असल्याने ही तूट निर्माण होत आहे. शिवाय गॅसच्या टंचाईमुळे बहुतांश भागात विद्युत उपकरणांच्या वापरामुळेही तूट वाढली आहे. भारनियमन तात्पुरता उपाय ही भारनियमनाची स्थिती कायमस्वरूपी नाही. येत्या तीन-चार दिवसांत तापमानाचा पारा थोडा खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेची मागणी घटेल आणि त्यानंतर कोणत्याही फीडरवर आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ येणार नाही, अशी अधिकृत माहिती महावितरण व महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली आहे. अॅनालिसिस – प्रामाणिक ग्राहकांना फटका नाही, ‘हे’ भाग टार्गेटवर राज्यात सरसकट वीज कपात न करता महावितरणने भारनियमनासाठी फक्त ‘जी-१ ते जी-३’ या गावठाण फीडर्सची निवड केली आहे. यामागील ‘इनसाइड स्टोरी’ अशी आहे की, तुटवड्याच्या काळात प्रामाणिक वीज ग्राहकांना झळ बसू नये म्हणून महावितरणने जाणीवपूर्वक गळती असलेल्या भागांना लक्ष केले आहे.
