56 इंचाची छाती अन् काँग्रेसची इतकी भीती?:महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी; मणिपूरवर मौन का? नाना पटोलेंचा मोदींच्या भाषणावर सवाल
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. “५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते?” असा सवाल करत, मोदींनी आपल्या भाषणात १५० पेक्षा जास्त वेळा काँग्रेसचा उल्लेख करून आपली हतबलता दाखवून दिली आहे. महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी सुरू असून, मणिपूरवर मौन का? असा बोचरा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यात नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक दाव्याचा समाचार घेतला. २०२६ उजाडले, तरी आरक्षणाचे आश्वासन हवेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, “२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आणले तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २०२४ मध्ये जनगणना करून मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले गेले होते. आज २०२६ साल उजाडले आहे, तरीही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. देशाचा पंतप्रधान वारंवार खोटे बोलत असल्याने जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.” ओबीसी जनगणना आणि मणिपूरवरून कोंडी राहुल गांधी यांच्या दबावामुळे सरकारने जनगणना सुरू केली, मात्र त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना (Column) नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. “यावरून पंतप्रधान बहुजनांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे नारीशक्तीला नमन करायचे आणि दुसरीकडे मणिपूरमध्ये महिलांचे वस्त्रहरण झाले, तेव्हा मौन बाळगायचे, हा कसला सन्मान?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हे नमन नारीशक्तीला नव्हे, तर खुर्चीला! पंतप्रधानांचे भाषण हे देशातील महिलांसाठी नसून सत्ता टिकवण्यासाठी आणि ‘मनूवादी’ व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. “हे नारीशक्तीला नमन नसून केवळ खुर्चीसाठी केलेले नमन आहे. पंतप्रधान टेलिप्रॉम्टर समोर येऊन केवळ ‘नौटंकी’ करत आहेत. त्यांचा नकलीपणा आता देशासमोर आला आहे,” अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या भाषणावर टीकास्त्र सोडले. भाजप वि. काँग्रेस: महिला प्रतिनिधित्वाचा आकडा भाजपच्या महिला प्रेमाचा दावा खोडून काढताना पटोले यांनी आकडेवारी सादर केली. “लोकसभा निवडणुकीत भाजपने केवळ १० टक्के महिलांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने १३ टक्के महिलांना संधी दिली. भाजपला प्रत्यक्षात महिला नको आहेत, काँग्रेसनेच नेहमी महिलांचा सन्मान केला आहे,” असा दावा त्यांनी केला. बहुजन महिला जागा दाखवेल! “तुम्ही कितीही अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही अभिनय केला, तरी देशातील बहुजन आणि दलित समाज तुम्हाला माफ करणार नाही. बहुजनांना न्याय मिळावा ही भूमिका राहुल गांधींनी सातत्याने मांडली आहे. आगामी काळात देशातील महिलाच तुम्हाला तुमची जागा दाखवतील,” असा इशारा देत नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा तीव्र निषेध केला.
