देगलूर नाका भागात चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी दोषी दोन अभियंत्यांचे निलंबन
जबाबदार कंत्राटदार व खाजगी बांधकाम धारकावर गुन्हा दाखलची करवाई
नांदेड- नांदेड शहरात घडलेल्या चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक चौकशी अहवालात कर्तव्यात कसुरी आणि निष्काळजीपणा आढळल्याने, *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या आदेशानुसार संबंधित विभागातील पाच अभियंत्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
देगलुर नाका परिसरातील एमजीआर गार्डन जवळ गुरुवार दि.१६ एप्रिल २०२६ रोजी इस्लामपुरा भगातील राहणारी १० ते १३ वयोगटातील चार मुले खेळता-खेळता खोल खड्यात साचलेल्या पाण्यात बुडाली. महापालिकेमार्फत या ठिकाणी नाल्याचे काम सुरु होते. त्याअनुषंगाने कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत *सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता शिवकन्या जायभाये व कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी* यांच्यावर पालिका आयुक्ता मार्फत *निलंबनाची* कार्यवाही करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कामावर पर्यवेक्षकीय अभाव असल्याचा ठपका ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागाचे *प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर तर पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता प्रकाश कांबळे व कनिष्ठ अभियंता जकीउल्ला खाँन* यांना कामात निष्काळजीपणा केल्याबाबत निलंबित का करण्यात येऊ नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्याचवेळी सदरील दुर्घटनेस जबाबदार असलेले *कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन,नांदेड* तसेच संबंधीत कामाचे प्रकल्प अभियंता / प्रकल्प पर्यवेक्षक / कामावर देखरेख करणारे व्यक्ती व घटनास्थळाच्या पूर्वेस आयेशा पार्क मधील *प्लॉट धारक मो.युसुफ मकरानी* यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी प्र.कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांना आयुक्तांनी प्राधिकृत केले आहे.
या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागास व जिल्हाधिकारी यांना सादर करण्यासाठी प्र.कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांना आदेशीत केले आहे. त्याचप्रमाणे सदर दुर्घटनेस जबाबदार कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन,नांदेड यांना मृतांच्या नातेवाईकांना त्वरीत *नुकसान भरपाई* देण्याची कार्यवाही करण्यासाठी पालिकेमार्फत निर्देशित करण्यात आले आहे.मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व राजीव गांधी अपघात विमा योजने अंतर्गत मदत मिळण्यासाठी सुद्धा रितसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले असुन भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेऊन उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी परिपत्रक निर्गमित केले आहे.
*पालकमंत्री ना.अतुल सावे यांचे प्रतिपादन :*
शहरातील सार्वजनिक विकास कामात सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या प्रत्येक घटकावर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतांच्या कुटुंबाप्रती शासन संवेदना व्यक्त करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा मानकांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Post Views: 12
