प्रशासन थेट लाभार्थींच्या दारापर्यंत:728 समस्या जागेवरच निकाली, दिंडाेरीमधील काेशिंबेतील समाधान शिबिरास प्रतिसाद
![]()
शासकीय योजनांचा लाभ थेट ग्रामस्थांच्या दारी पोहोचवण्यासाठी ‘गाव भेट समाधान शिबिर’ उपक्रमाची सुरुवात ठेंगोडा येथे झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात पार पडला. तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ठेंगोडा येथील कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी महेश शेलार, बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, सरपंच भारती वाघ आणि नारायण निकम उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या शिबिराच्या माध्यमातून रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, रहिवासी व जात दाखले, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, सातबारा उतारे, प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती अशा विविध सेवांचा लाभ ग्रामस्थांना देण्यात आला. विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त विविध विभागांमार्फत तब्बल ७२८ दाखले आणि शासकीय योजनांचे लाभ थेट नागरिकांच्या हाती देण्यात आले. प्रशासनाने एकाच छताखाली इतक्या लाभार्थ्यांना सेवा पुरवल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या जनहितार्थ योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिंडोरीचे नायब तहसीलदार महेंद्र मोतीराय यांनी सांगितले की, समाधान शिबिर हे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, नागरिकांच्या अडचणी जागेवर सोडवण्यासाठी राबवलेला प्रभावी उपक्रम आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी प्रशासन त्यांच्या गावात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शिबिरात महसूल, पुरवठा तसेच इतर संबंधित विभागांकडून दाखल्यांची पडताळणी करून जागेवरच वितरण करण्यात आले. यात उत्पन्न दाखले, जात दाखले, रेशनकार्ड दुरुस्ती, तसेच विविध शासकीय योजनांच्या मंजुरीपत्रांचा समावेश होता. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षण अधिकारी अक्षय लोहारकर, मंडल अधिकारी प्रमोद साळुंखे, सरपंच विलास वाटाणे, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ गायकवाड, कोकणगावचे सरपंच परसराम डंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. एकाच छताखाली ७२८ लाभार्थ्यांना सेवा मिळाल्याने हे अभियान यशस्वी ठरल्याचे मोतीराय यांनी सांगितले.
