पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अभिवादन सोहळा:राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मान्यवरांनी महामानवाला वाहिली आदरांजली
![]()
पुण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समिती’च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गणेश बिडकर, नगरसेवक निलेश आल्हाट, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे आणि महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार आणि समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या मानवंदनेने झाली. त्यानंतर बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना आणि भीमस्तुती सादर करण्यात आली. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापुरुषांना जातीमध्ये विभागू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भारतात आर्थिक, शैक्षणिक समता आणि आदर्श लोकशाही रुजली आहे, असेही त्यांनी नमूद केले. पाटील यांनी यावेळी आपले वैयक्तिक अनुभवही सांगितले.
