मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा निखळला:मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वच नेत्यांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक; कोण काय म्हणाले?
![]()
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर एकेक अवयव निकामी होत गेल्यामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 4 वा. शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते. शेलार यावेळी म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखाड बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशा ताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशा ताईंचे असणे हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचा प्रवास, दुःखाला स्वतः कवटाळून आणि दुसऱ्याला सुख देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचे संगीत क्षेत्रातल्या कर्तुत्वाने संपूर्ण जगाला वेड लावले होते. आज मेडिकलच्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात हा अंत्यसंस्कार होणार आहे. मंगेशकर कुटुंबातील दूसरा तारा हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा दुःखद प्रसंग आहे. मंगेशकर कुटुंबातील दूसरा तारा निखळला. आशा ताईंचे दुःखद निधन झाले आहे. 92 वर्ष त्या जगल्या. त्यातल्या वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी संगीताची सेवा केली ते शेवटच्या श्वासपर्यंत. या देशात सर्वात वर्सटाइल गायिका म्हणून कोणाकडे पहायचे असेल तर त्या आशा ताई होत्या. त्यांनी तोरा मन दर्पण कहलाये अशा प्रकारचे शास्त्रीय गीतही गायले. जेवढे प्रकार आहेत ते सगळे गाणे त्यांनी गायली आहेत. 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या वर्षी तीन तास त्यांनी परफॉर्म करण्याचा कार्यक्रम त्यांनी केला होता. त्यांनी अतिशय खडतर प्रवास केला होता. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही कार्यक्रमात असताना त्या तिथल्या प्राण असायच्या. त्या नेहमी हसतमुख होत्या. लता मंगेशकर यांची शंभरावी आम्ही करू शकलो नाही, पण आशा ताईंची करायची अशी आमची इच्छा होती. पण ते दुर्दैवाने आम्हाला नाही करता येणार. पूर्ण शासकीय इतमामात संपूर्ण विधी पार पडतील. संगीतासाठी आजचा दिवस अतिशय दुःखद आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावर देखील आपले दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या, अशा आठवणी फडणवीस यांनी मांडल्या आहेत. अशोक सराफ यांनी जागावल्या आठवणी अशोक सराफ म्हणाले, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. एकदा त्यांचे रेकॉर्डिंग सुरू होते. मी तिथे गेलो होतो. त्यात ‘काय’ असे म्हणायचे होते. त्यात त्यांनी मलाच म्हणायला आग्रह केला आणि मी हिम्मत करून तो शब्द त्या लावणीत म्हटला आहे. जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो तसंच त्या देखील माझ्या फॅन होत्या. त्यांचा स्वर कुठेही पोहोचायचा, वरच्या स्केलवर सहज जायचा. महेश कोठारेंनी व्यक्त केल्या भावना महेश कोठारे म्हणाले, फार दुःखद बातमी आहे. त्यांनी पहिल्यांदा मला प्ले बॅक दिले होते. ‘तो हा माधव बरवा’, हे गाणे त्यांनी गायले होते. मी लहान होतो तेव्हा. त्यांनी माझ्या जिवलगा चित्रपटात गाणे गायले होते, ‘जिवलगा राजसा’ हे ते गाणे होते. त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. असे अनेक गाणे होते, जे फक्त त्याच गाऊ शकत होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला- उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते, लता दीदी यांच्या नंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभा प्रमाणे उभ्या होत्या, भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला, त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली. संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील- शरद पवार शरद पवार म्हणाले की, आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अंबादास दानवे यांनी पोस्ट करत वाहिली श्रद्धाजंली शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, स्वरांच्या दुनियेतील अखंड ऊर्जा आणि भारतीय पार्श्वगायनाचा देदीप्यमान तारा म्हणजे ‘आशाताई’! शास्त्रीय बाजाची गाणी असोत किंवा रिदमिक पॉप, आशा भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आणि गाजवत राहणार. त्यांच्या संगीतातील अष्टपैलुत्वाला मानाचा मुजरा! भावपूर्ण श्रद्धांजली. गायिका पद्मजा फेणाणी यांनी व्यक्त केल्या भावना गायिका पद्मजा फेणाणी म्हणाल्या, कल्पना होती कालपासून की त्यांची तब्येत बरी नाहीये. लता मंगेशकर यांच्या नंतर आशा भोसले यांनी स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व घडवले होते. त्यांनी हजारी गाणी गाऊन विक्रम केला आहे. खूप कठीण परिस्थितीत त्यांनी आयुष्य काढले आहे. आजच्या सारखे स्टुडिओ तेव्हा नव्हते, परंतु, त्या स्टुडिओमध्ये सुद्धा लाईव्ह परफॉर्म करणे खूप कठीण होते. मी ही बरीच गाणी लाईव्ह केली आहेत, त्यामुळे मला माहीत आहे किती कठीण असते ते. नंदलाला रे हे अतिशय कठीण असे गाणे होते आणि मला ते खूप आवडते. माझी आणि त्यांची अनेकवेळा भेट व्हायची. अतिशय प्रेमाने त्या भेटायच्या. त्यांनी एकदा माझ्यासाठी सोनचाफा आणला होता अन त्या फुलांचा सुगंध आणि त्या आठवणी अजूनही माझ्यासोबत आहेत आणि राहणार. बंगालने देखील त्यांना बंग विभूषण देऊन त्यांचा सन्मान केला- छगन भुजबळ छगन भुजबळ म्हणाले, केवळ हिंदी गाणीच नाही तर विदेशातली देखील त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना दादासाहेब फालके पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहेच, पण बंगालने देखील त्यांना बंग विभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता. पॉप, भजन, क्लासिकल, चित्रपट गीत असे अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. आशा ताईंचे निधन आपल्या सगळ्यांवर आघात- नितीन गडकरी नितीन गडकरी म्हणाले, आशा ताईंनी अनेक गीत गायली आहेत. त्या सदैव स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या मृत्यूने आपण अशा गायिकेला मुकलो आहोत, की ज्यांनी आपल्या देशाचे नाव विश्वात प्रसिद्ध केले. त्यांचे हे निधन आपल्या सगळ्यांवर आघात करणारे आहे. संगीतावर प्रेम करणारा प्रत्येकजण धक्क्यात आहे- रोहित पवार रोहित पवार म्हणाले, गेल्या सहा दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत विश्वावर आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांचं निधन झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला चटका लावणारं आहे. भारतीय संगीत विश्वावर त्यांनी उमटवलेला अमीट ठसा कायम अजरामर आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि देशातील संगीतावर प्रेम करणारा प्रत्येकजण धक्क्यात आहे. त्यांच्यासह भोसले कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना! संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी- विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार म्हणाले, सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजाने संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. स्वरांच्या दुनियेतील तेजस्वी तारा निखळला- धीरज देशमुख धीरज देशमुख म्हणाले की, आपल्या सुरेल व दैवी स्वरांनी भारतातीलच नव्हे; तर जगभरातील गानरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रख्यात गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद व मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने स्वरांच्या दुनियेतील तेजस्वी तारा निखळला आहे. मास्टर दीनानाथ यांच्या गाण्यांचा आशाताईंना वारसा मिळाला. हा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला. संघर्ष आणि स्पर्धेला धीराने तोंड देत त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी मोहोर उमटवली. वीसपेक्षा जास्त भाषेत आणि बारा हजारपेक्षा जास्त गाणी होऊन त्यांनी रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी असे आहे.
वयाच्या पाचव्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. आपल्या आवाजाने कोट्यवधींच्या जीवनात त्यांनी आनंदाचा, उत्साहाचा झरा निर्माण केला. स्वरसम्राज्ञी म्हणून त्या कायम भारतीयांच्या स्मरणात राहतील. त्यांना माझ्या आणि देशमुख कुटुंबियांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आशाताई, काय लिहू? सारेच निशब्द – चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आशाताई, काय लिहू? सारेच निशब्द आहे !! निव्वळ चैतन्य लिहू की दैवी सूर लिहू? वयाला व आवाजाला मिळालेले ययातीचे तारुण्य लिहू? तुम्ही अद्भुत ! जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणं क्षणभरात निमालं ! संपलं. आम्ही अपूर्ण झालो! सुरांच्या वैविध्यावरील तुमचे भाष्य म्हणजे, तुम्ही संगीतातील विद्यापीठ. एक युग संपले ! आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककेलेचं अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं. मना, तुझे मनोगत मला कधी कळेल का? तुझ्यापरी गूढ.. सोपे होणे मला जुळेल का? असा प्रश्न विचारणाऱ्या तुम्ही उत्तर देऊन निघून गेल्या. कायम प्रसन्न आशादायी आशा, आज निराशा करून पुढच्या प्रवासाला कायमची निघून गेली. आशाताई, तुम्ही गायलेली कितीतरी गाणी मनात आहेत. डोक्यात आहे. हृदयात आहेत. काय लिहू आशाताई? तुमच्या जाण्याने दैवी सुरांची आशा संपली. आशाताई नावाचे आनंदाचे गाव.. राम राम करून दूर निघून गेले. ताई, तुम्ही अजरामर आहात. माझी विनम्र आदरांजली!! मंत्री अतुल सावेंनी व्यक्त केल्या भावना मंत्री अतुल सावे म्हणाले की, भारतीय संगीतविश्वाला आपल्या सुरांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं आपल्या मधुर व अजरामर गीतांनी त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या आवाजातील जादू, कलेप्रती असलेलं समर्पण आणि भारतीय संगीताला दिलेलं अनमोल योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
