शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही:पवारांचे राज्यासाठी योगदान मोठे, पण त्यांचा पिंड निधर्मी; CM फडणवीसांची टीका
![]()
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे मला दुःख वाटते,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दाव्यांचा समाचार घेतला. नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर भाष्य केले. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली होती. याच विधानाचा मुख्यमंत्री फडणवीसांनी समाचार घेतला. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांचे महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असले तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली, ती चळवळ एकप्रकारे निधर्मी अशा प्रकारची चळवळ होती. त्यांनी स्वतःही अनेकवेळा कबूल केले आहे की, ते निधर्मी आहेत. धर्म मानत नाहीत. त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे.” ‘अर्बन नक्षल’चा उल्लेख आणि प्रति-यादीचा इशारा शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील प्रतिगामी लोकांची यादी तयार करत असल्याचे म्हटले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “पवारांना यादीच हवी असेल, तर मी त्यांना अशा लोकांची यादी पाठवून देईन, जे वारकरी विचारांच्या विरोधात जाऊन संप्रदायात विष पेरण्याचे काम करत होते. ज्यांना वारकरी संप्रदायाने स्वतःहून झिडकारले, अशा लोकांचा संबंध आम्हाला ‘अर्बन नक्षल’ चळवळीशी पाहायला मिळाला आहे.” वारकरी विचार हा श्रद्धेचा विचार वारकरी संप्रदायाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेऊन चालणारा, बंधुता जोपासणारा आणि चित्तशुद्धीचा विचार आहे. हा श्रद्धेचा विचार आहे. साहित्यात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला, तरी वारकरी संप्रदायावर चुकीची टीका करणे अयोग्य आहे. मला असं वाटतं की शरद पवारांचा जो काही लेख आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. मला दुःख आहे की शरद पवारांनी अशा प्रकारचा लेख लिहिला.” साहित्य संमेलनातील लेखावर नाराजी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळी मते येत असतात. शेवटी साहित्य संमेलनाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून, देशाचे माजी कृषिमंत्री म्हणून किंवा एकूणच राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान आहे म्हणूनच त्यांचा लेख घेतला. त्यात काय लिहावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तो लिहिला.”
