Pune Mango Festival 2026 Inauguration; Minister Rawal Focus on Farmers
पुणे येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’ चे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट
.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात मुंबई आणि नवी दिल्ली येथेही आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा मंत्री रावल यांनी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय कदम आणि सरव्यवस्थापक विनायक कोकरे उपस्थित होते.
सन २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालय आवारात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था आणि महामँगो यांच्या माध्यमातून उत्पादक ते ग्राहक थेट आंबा विक्रीची संकल्पना सुरू झाली होती. आज ही संकल्पना एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाली असून, यंदा महोत्सव रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
यंदाचा महोत्सव सुमारे ४० दिवस चालणार असून, त्यात एकूण ६० स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉलवर दोन शेतकरी आपला आंबा थेट ग्राहकांना विकत आहेत. येत्या काळात पणन मंडळाच्या वतीने सुमारे १५० स्टॉल उभारण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात कायमचे संबंध निर्माण होतात.
या महोत्सवात कोकणातील पाच जिल्ह्यांमधील भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त हापूस आंबा उपलब्ध आहे. तसेच, राज्यातील केशर, पायरी आणि इतर विविध वाणांचे आंबेही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. भौगोलिक मानांकनामुळे अस्सल हापूस ओळखणे सोपे होते आणि ग्राहकांची फसवणूक टळते.
बदलत्या काळानुसार, ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून आंब्याला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय, ‘नो युवर फार्मर’ (NUF) या संकल्पनेमुळे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांची माहिती मिळेल, ज्यामुळे विश्वासार्हता वाढेल. आगामी काळात समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून या महोत्सवाचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जाईल.
भारतातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानामुळे आंब्याच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हापूस आंबा त्याच्या चव, सुगंध आणि गुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसेच लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागात केशर आंबा उत्पादन घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा मालाला अधिकाधिक भाव मिळून त्याची आर्थिक स्थर्यता मिळू शकेल.

