US Iran Ceasefire | भारतासाठी मोठी बातमी! मध्यपूर्वेतील युद्ध थांबताच सर्वसामान्यांना मोठा दिलासा?
US Iran Ceasefire | पश्चिम आशियातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्याने भारतासाठी दिलासादायक घडामोडी समोर येत आहेत. United States आणि Iran यांच्यात 14 दिवसांची शस्त्रसंधी झाल्याने आखातातील परिस्थितीत स्थिरता येऊ लागली आहे. या निर्णयामुळे जहाज वाहतूक पुन्हा सुरू होत असून भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावरील मोठे संकट सध्या तरी टळल्याचे मानले जात आहे. यामुळे देशातील इंधन पुरवठा आणि किमतींवरील दबावही कमी होण्याची शक्यता आहे.
युद्धाच्या काळात फारसचा आखात आणि Strait of Hormuz परिसर अत्यंत तणावपूर्ण बनला होता. या भागातून जगातील मोठ्या प्रमाणात तेलवाहतूक होते. संघर्षामुळे जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाला आणि भारताची 16 मालवाहू जहाजे या भागात अडकून पडली होती. या जहाजांवर सतत हल्ल्याचा धोका निर्माण झाला होता.
मात्र आता 14 दिवसांच्या युद्धविरामामुळे सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अडकलेली सर्व भारतीय जहाजे टप्प्याटप्प्याने भारताकडे रवाना होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार हा कालावधी भारतासाठी ऑपरेशनल दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
US Iran Ceasefire | एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला दिलासा :
भारत मोठ्या प्रमाणात खाडी देशांतून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करतो. त्यामुळे या भागातील तणाव वाढला की भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होतो. युद्धविरामामुळे एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आलेला अडथळा दूर होण्याची शक्यता आहे.
जहाजांची हालचाल पुन्हा सुरू झाल्याने इंधन साठ्यावर येणारा दबाव कमी होईल आणि पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल. परिणामी इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होण्याचा धोका कमी होऊन त्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकतो.
खाडी देशांतील भारतीयांची सुरक्षितता :
खाडी देशांमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय वास्तव्यास आहेत. गेल्या काही आठवड्यांत सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. युद्धविरामामुळे हवाई मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून आवश्यक असल्यास भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.
सध्या इराण मध्ये अंदाजे 7500 भारतीय नागरिक आहेत. परिस्थिती स्थिर होताच त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्नही सुरू केले जाऊ शकतात. त्यामुळे या युद्धविरामामुळे भारताला आर्थिक आणि मानवी दोन्ही स्तरांवर मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
