बीड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी:संतोष देशमुखांच्या निधनानंतर जागा रिक्त; धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
![]()
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आजपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. सदस्य किंवा सरपंचांचे निधन, राजीनामा आणि अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या 16 सरपंच आणि 72 सदस्य पदांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, प्रशासकीय स्तरावर या प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, इच्छूक उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 28 एप्रिल रोजी पार पडणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल घोषित केला जाईल. पुढील काही दिवस जिल्ह्यातील या 88 गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार असून गावपातळीवरील सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांनी जे काम केले आहे, तोच मानस गावकऱ्यांचा असणार आहे. गावकऱ्यांच्या विचारावर आम्ही थांबलेलो आहोत. येणाऱ्या दोन-तीन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील. आजी-माजी सदस्य पॅनल प्रमुख गावकऱ्यांची बैठक झाली. यात निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा झाली. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा अनुभव पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, 18 महिन्यांचा उरलेला कालावधी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध करण्याचा मानस आहे. गावाच्या विकासासाठी टीम वर्कची गरज असते. स्वर्गीय देशमुखांनी पंधरा वर्ष गावासाठी घातले आहे. या निवडणुकीसाठी शक्यतो मी उमेदवार नाही. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे.येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल? हा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल. मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. पण, मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची आहे. मला केसला वेळ द्यायचा आहे. मला कुठला दबाव नाही. मला कुठली अपेक्षा नाही आणि भीतीही नाही, असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या दोन-तीन दिवसात आम्ही सर्वजण बसून तोडगा काढणार आहोत. देशमुख कुटुंबावर आलेले संकट कुणी संधी म्हणून बघू नये. उरलेल्या कालावधीत संतोष अण्णांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
