भारत-अमेरिका कृषी करारामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका:अमरावतीत किसान-मजूर परिषदेत प्रा. मेटे यांची मांडणी, एकजुटीचे आवाहन

0
a6baa692-6d97-407c-9039-599e7e714c81_1775493516490.jpg




अमरावती येथे झालेल्या किसान-मजूर परिषदेत भारत-अमेरिका कृषी करारावर तीव्र टीका करण्यात आली. या करारामुळे भारतीय शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचे मत प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का देणारे निर्णय सातत्याने घेतले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे येथील सुदामकाका भवनात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाई प्रा. अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस अशोक सोनारकर, प्रा. विजय रोडगे, प्रा. साहेबराव विधळे आणि बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सचिव संजय मंडवधरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्र सरकारने केलेला हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरेल आणि तो शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यासारखा आहे. विकसित देशांतील मोठ्या प्रमाणावर अनुदानित शेतीसमोर भारतीय लहान शेतकरी तग धरू शकणार नाहीत, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून हा करार पुढे रेटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या धोरणांविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या परिषदेत अखिल भारतीय किसान सभा, भारतीय खेत मजदूर युनियन आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिल (आयटक) या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, अपुऱ्या मोबदल्याचा प्रश्न आणि पुनर्वसनातील त्रुटी यावरही सखोल चर्चा करण्यात आली. इतर वक्त्यांनी भारतीय शेतीवर वाढत असलेल्या परकीय दबावावर चिंता व्यक्त केली. भारत-अमेरिका करारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती असून, हा लढा केवळ कराराविरोधात नसून भारतीय शेतीच्या अस्तित्वासाठी असल्याचे मत त्यांनी मांडले. शेती वाचवायची असेल, तर केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांविरोधात कठोर संघर्ष करावा लागेल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या परिषदेचे प्रास्ताविक किसान सभेचे पुढारी सतीश चौधरी यांनी केले, तर प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एम. वाय. शहाणे, धनंजय मस्के, राजेश चर्जन, अर्चना भांडवलकर, लक्ष्मणराव धाकडे, जे. एम. कोठारी, निळकंठ ढोके, प्रा. प्रफुल कडू यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed