[ads1]
एमपीएससी (MPSC) पेपरफुटीचे धागेदोरे आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय असे पेपर फुटणे शक्यच नाही, असे सांगत त्
.
संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप
राऊत यांच्या मते, आयोग आणि परीक्षा यंत्रणांमध्ये राजकीय हस्तक्षेपातून मर्जीतील व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. याच नियुक्त्यांचा फायदा सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्यातील उमेदवारांना होत आहे. पेपरफुटी प्रकरणात इतक्या लोकांना अटक करून चौकशी केली जात असेल, तर मंत्री असले म्हणून काय झाले? त्यांनाही चौकशीसाठी बोलावले पाहिजे, अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली आहे.

मंत्री झिरवाळांचे कार्यालय आणि आरोपींचे ‘नंदुरबार कनेक्शन’
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ‘औषध निरीक्षक’ पदाच्या 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर फुटला होता. या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे आरोपी गौरव पाटील याच्या नंदुरबार येथील घरात तब्बल 3 वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील, गौरव पाटील आणि ओएसडी गणेश देवरे हे सर्वजण नंदुरबारमधील एकाच कॉलनीतील रहिवासी असल्याने संशयाला अधिक बळ मिळाले आहे.
महिनाभरापासून ओएसडी गायब
पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यापासून गणेश देवरे हे मंत्री कार्यालयात फिरकलेले नाहीत. कृषी विभागातून उसनवारीवर आलेल्या देवरे यांना 25 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी याच कार्यालयातील एका लिपिकाला लाच घेताना अटक झाली होती, त्यामुळे हे मंत्रालय पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आयोगाच्या पार्किंगमध्येच पैशांचा व्यवहार
याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत 7 जणांना अटक केली असून यात राज्य लोकसेवा आयोगाच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आयोगाकडून ही 488 उमेदवारांची भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात आली आहे. आयोगाच्या गोपनीय कक्षातील अधिकारी विश्वेश्वर नकाते याने 294 प्रश्नांचा संच चोरून त्याच्या झेरॉक्स काढल्या आणि लॅपटॉपवर टाईप करून प्रश्नसंच तयार केला. हा पेपर त्याने अवर सचिव अभिजीत लेंडवे याच्याकडे दिला, तिथून तो कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि नंतर नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे, या प्रश्नसंचाच्या बदल्यात 5 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार थेट आयोगाच्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग लॉबीमध्येच झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
MPSCच्या 3 कर्मचाऱ्यांसह आरोपींना अटक
औषध निरीक्षक गट-ब पदासाठी MPSCने 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा घेतली होती. परीक्षेतील काही प्रश्न आधीच काही उमेदवारांना मिळाल्याची माहिती आयोगाला मिळाल्यानंतर 27 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात MPSCच्या 3 कर्मचाऱ्यांसह एकूण 7 जणांना अटक झाल्याची माहिती आहे. त्यात नंदुरबारमधील कौटिल्य अकादमीचे प्रवीण पाटील तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांचा समावेश आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे.
294 प्रश्नांचा स्वतंत्र संच तयार केल्याचा संशय
तपासात प्रश्नपत्रिका फुटण्याची साखळीही समोर आल्याचे सांगितले जात आहे. आयोगाच्या गोपनीय कक्षात उपलब्ध प्रश्नांपैकी 294 प्रश्नांचा स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आल्याचा तपासातील दावा आहे. अधिकारी विश्वेश्वर नकाते याने गोपनीय कक्षातून प्रश्न बाहेर काढून त्याच्या प्रती तयार केल्या आणि लॅपटॉपवर प्रश्नसंच तयार केल्याचा संशय आहे. हा संच पुढे अवर सचिव अभिजीत लेंडवे, कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि त्यानंतर प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. या प्रश्नसंचाच्या बदल्यात आयोगाच्या कार्यालयाच्या आवारातील पार्किंग लॉबीमध्ये सुमारे ₹5 लाखांचा व्यवहार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या व्यवहारातील सहभागी आणि त्याचा पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीशी असलेला संबंध तपासला जात आहे.
मंत्री कार्यालय आधीही चर्चेत
नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तीचे नाव यापूर्वीही एका लाच प्रकरणात चर्चेत आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना अटक झाली होती. आता MPSC पेपरफुटी प्रकरणात OSDचे नाव आरोपीच्या घरातील भाडेकरू म्हणून समोर आल्याने मंत्री कार्यालयाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तपासाची दिशा आता महत्त्वाची
MPSC पेपरफुटी प्रकरणात आयोगातील कर्मचाऱ्यांना अटक झाल्यामुळे अंतर्गत यंत्रणेतील संभाव्य सहभागाचा मुद्दा आधीच तपासाच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच आरोपीच्या घरात मंत्री कार्यालयातील OSD राहत असल्याची माहिती समोर आल्याने या संबंधाचा तपास करण्याची मागणी होत आहे.
संजय राऊत यांनी सरकारी यंत्रणेतील संभाव्य सहभागाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, गणेश देवरे यांचा पेपरफुटीशी संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे OSD आणि आरोपी यांच्यातील नेमका संबंध काय, त्यांना एकमेकांच्या प्रकरणाची माहिती होती का आणि या संबंधाचा पेपरफुटीशी काही प्रत्यक्ष संबंध आहे का, हे गुन्हे शाखेच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
पुण्यात कलम 144 कशासाठी?:विद्यार्थ्यांच्या मोर्चाला घाबरताय का?; रोहित पवारांचा सरकारला आणि पुणे पोलिसांना खडा सवाल

पुणे पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी एमपीएससी (MPSC) पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूंबाबत मोठे दावे करत सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी
[ads2]
















Leave a Reply