जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर लोढांची तोफ; 'फूट डालो' धोरणावर प्रहार
![]()
राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा ‘हिंदू अस्मिते’चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या ‘फूट डालो आणि राज करो’ या कुटिल नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे,” अशा जळजळीत शब्दांत लोढा यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विभाजनाचे राजकारण आणि लोकसंख्येची घटती आकडेवारी दक्षिण भारताचे उदाहरण देत लोढा यांनी धक्कादायक वास्तव समोर ठेवले. एकेकाळी दक्षिण भारतात २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ ३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लीम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले, मात्र हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करून कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. जैन मुनींशी चर्चा; कायदेशीर प्रक्रियेचे संकेत हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरू असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे सूतोवाचही त्यांनी दिले आहे. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा ‘आम्ही हिंदू’ ही भावना प्रबळ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय अनागोंदी की राजकीय अजेंडा? पत्रकारांशी संवाद साधताना लोढा यांचा सूर केवळ धार्मिक नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारणारा होता. “ज्या जैन समाजाने जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला, त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करणे हा सांस्कृतिक द्रोह आहे,” असे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. आता चेंडू जैन समाजाच्या आणि सरकारच्या कोर्टात असून, या विधानाचे पडसाद आगामी काळात उमटणार हे निश्चित आहे. जैन धर्मियांची पूजा पद्धती वेगळी असू शकते, पण सांस्कृतिक मुळे हिंदू धर्मातच रुजलेली आहेत. राजकीय फायद्यासाठी लादलेला ‘अल्पसंख्याक’ हा शिक्का आता पुसून टाकण्याची ऐतिहासिक वेळ आली आहे. -मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य.
