वजीराबाद येथील धर्मशाळा प्रकरणावर नागरिकांचा संताप; कारवाईची मागणी तीव्र


नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शान असलेले मंगल कार्यालय वजीराबाद परिसरातील धर्मशाळेच्या जागेचा कथित बेकायदेशीर व व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गौतम हिरावत जैन यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनानुसार, सदर धर्मशाळेची जागा सन १९३६ मधील आदेशानुसार सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी व सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र सध्या या जागेचा वापर व्यावसायिक (कमर्शियल) कारणांसाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मनपा नगररचना विभागाकडून दिशाभूल करून परवानगी घेण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे.या जागेचे उर्दू भाषेतील कागदपत्र उपलब्ध आहेत. अगोदर जुन्या इमारतीवर मारवाडी धर्मशाळा असे नाव लिहिलेले होते. पण सर्व धर्माच्या लोकांना जागा दिली जात होती.

याशिवाय, मारवाडी धर्मशाळा ट्रस्टमार्फत जागेचा वापर केवळ काही समाजापुरता मर्यादित ठेवला जात असल्याचे सांगत, हे सार्वजनिक उद्देशाला विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुनी धर्मशाळा पाडून त्या ठिकाणी शॉपिंग मॉल, कमर्शियल दुकाने व बँक्वेट हॉल उभारण्याचा प्रस्ताव असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

नागरिकांनी या प्रकरणात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

दिशाभूल करून मिळवलेली परवानगी तात्काळ रद्द करावी

संबंधित अधिकाऱ्यांवर व व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत

धर्मशाळा ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण ऑडिट चौकशी करावी

सदर जागेचा वापर सर्व समाजासाठी खुला ठेवावा

प्रस्तावित व्यावसायिक प्रकल्पांना स्थगिती द्यावी

स्वतंत्र समितीमार्फत सविस्तर चौकशी करून अहवाल जाहीर करावा

प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन व जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर तात्काळ, पारदर्शक व ठोस कारवाई करून चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी शेवटची सूचना नागरिकांकडून करण्यात आली आहे.आज सुद्धा हि जागा सार्वजनिक उपयोगाची राहावी असे गौतम जैन सांगतात.

शहरातील जीव्हीसी ग्रुपने हे काम घेतले असल्याचे सांगण्यात आले. परवानगी कोणाच्या नावाची आहे, कशी आहे,काय उभारले जाणार जुन्या पद्धतीचे काय होणार अश्या अनेक चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पण जीव्हीसी ग्रुप आपल्या फायद्या शिवाय हे करणारच नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. यात चुकीचे काय फुकट,सेवा,दया हे भाव आता कलीयुगात समाप्तच झालेले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *